- सुब्रमणिपुरम या २००८ मध्ये प्रदर्शित दाक्षिणात्य चित्रपटात मरिमुथूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती
- मरिमुथूचा जन्म मदुराईमध्ये झाला होता. त्याचे बालपण आई-वडिलांशिवाय संघर्षमय झाले होते
- पहिल्या चित्रपटातील यशानंतर दारूच्या व्यसनामुळे आणि चुकीच्या कॉलमुळे त्याला काम मिळणे थांबले
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'कल्ट क्लासिक' मानल्या जाणाऱ्या 'सुब्रमणिपुरम' या चित्रपटाने 2008 मध्ये इतिहास घडवला. आजही या चित्रपटाची चर्चा सिनेसृष्टीत होते. मात्र, याच सुपरहिट चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता मरिमुथू आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. कधीकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला हा कलाकार आज पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याचा तो पहिलाच चित्रपट होता. तो हिट ही झाला. मात्र त्यानंतर त्याच्याकडे नशिबानेच पाठ फिरवली अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
एका संवादाने मिळवली होती लोकप्रियता
शशिकुमार दिग्दर्शित 'सुब्रमणिपुरम'मध्ये मरिमुथूने 'दुमखान' नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याचा एक संवाद प्रचंड गाजला होता. मदुराईचा रहिवासी असलेल्या मरिमुथूचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षाचे राहिले आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्याने केवळ तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तो लाईट आणि मायक्रोफोन सेट बनवण्याचे काम करू लागला. त्याची हीच जिद्द पाहून दिग्दर्शक शशिकुमारने त्याला चित्रपटात संधी दिली होती. त्या संधीचे पहिल्याच प्रयत्नात सोने ही झाले. पण तेवढ्याच वेगाने त्याचे नशिबाचे फेरे चुकले.
दारूचे व्यसन आणि एक चुकीचा कॉल ठरला महागात
पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर मरिमुथूचे नशीब उजळेल असे वाटले होते, पण वास्तव वेगळेच ठरले. एका मुलाखतीत त्याने आपल्या अधोगतीचे कारण स्पष्ट केले. त्याने दिग्दर्शक शशिकुमार यांच्या नावाचा टॅटू स्वतःच्या शरीरावर गोंदवला आहे, मात्र एका चुकीमुळे शशिकुमार यांचा भाऊ त्याच्यावर प्रचंड रागावला. मरिमुथूने दारूच्या नशेत शशिकुमार यांच्या भावाचा वैयक्तिक नंबर अनेकांना वाटला, ज्यामुळे त्याला काम मिळणे बंद झाले.
रिक्षा दुरुस्त करायलाही पैसे नाहीत
सध्या मरिमुथू रेडिओ दुरुस्ती आणि रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र, त्याची रिक्षाही आता बंद पडली असून ती दुरुस्त करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याचे रिक्षा चालवतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. "मिळेल ते काम मी करतोय, पण आर्थिक चणचण संपत नाही," अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. आपण या पुढे ही मेहनत करत राहू. एक दिवस नशिब आपल्याला ही साथ देईल असा विश्वास ही त्याने व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world