- देशातील एटीएममध्ये कॅश तुटवडा भासतो आहे
- ग्रामीण आणि निमशहरी भागात विशेषतः महाराष्ट्रात एटीएममधून पैसे उपलब्ध होत नाही अशी स्थिती
- मार्च आणि एप्रिल महिन्यात बँकांकडून आवश्यक रोकड पुरवठा झाला नसल्याचे समोर
युद्धजन्य परिस्थितीत देशात पेट्रोल डिझेल आणि गॅस संकट अजूनही दुर झाले नाही. सर्वांच्याच किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. हे कमी म्हणून की काय आता नवं संकट देशावर आलं आहे. ते म्हणजे चलन तुटवड्याचे. सध्या देशातील एटीएममध्ये कॅशचा खडखडाट असल्याचं चित्र आहे. मागणीच्या तुलनेत कशीबशी 55 टक्के रोकड एटीएमच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे सध्या तरी एटीएममध्ये कॅशची चणचण भासत असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचा दावा कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने केला आहे. त्यांनी त्याबाबत इशाराही दिला आहे.
सध्याची देशाची आर्थिक स्थिती पाहाता चलनाचा मोठा साठा उपलब्ध आहे. असं असताना ही सर्व सामान्यांना एटीएममधून पैसे काढताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही स्थिती देशातील विवीध भागात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा विचार करता ग्रामिण आणि निम शहरी भागात लोक एटीएममधून मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात. पण तिथे त्यांना पैसे उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने भारतीय बँक संघ (आयबीए) आणि आरबीआयला पत्र लिहून एटीएम सेवा विस्कळीत होण्याची भिती व्यक्त केली आहे.
याबाबत अशी माहिती समोर येत आहे की मार्च आणि एप्रिय या महिन्यात देशभरात 94 हजार कोटी रुपयांची गरज होती. मात्र बँकांकडून मार्च महिन्या केवळ 61 हजार कोटी आणि एप्रिल महिन्यात फक्त 54 हजार केटी रूपये उपलब्ध करण्यात आले होते. एटीएम ऑपरेटर्सनी दिलेल्या माहितीतून ही गोष्ट समोर आली आहे. याचा फटका महाराष्ट्रातील ग्रामिण भागाला बसला आहे. सध्या पेरणीचे दिवस आहे. अशा स्थिती खते असतील की बियाणे असतील. काही जण याच काळा अवजारे ही खरेदी करतात. अशा वेळी कॅशची गरज शेतकऱ्यांना लागते. मात्र ती कॅश एटीएमच्या माध्यमातून उपलब्ध होत नसल्याचं समोर आलं आहे.
या रोकड टंचाईची काही कारणे समोर आली आहे. त्यात मुख्य कारण हे करन्सी चेस्टमधून कमी पुरवठा हे असल्याचं सांगितलं जात आहे. बँकांच्या शाखा आणि मुख्य करन्सी चेस्टमधून एटीएम ऑपरेटर्सना पुरेशा नोटा दिल्या जात नाही. असा दावा कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने केला आहे. त्याच बरोबर वाढता परिचालन खर्च ही कारणीभूत ठरत आहे. इंधन दरवाढ आणि कडक सुरक्षा नियमांमुळे एटीएम व्यवस्थापनाचा खर्च वाढल्याचं ही सांगितलं जात आहे. तर अनेक ठिकाणी 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने ATM मशीन लवकर खाली होत आहेत. अशा वेळी युपीआयचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. किंवा थेट बँक शाखेतून पैसे काढावेत असं सांगितलं जात आहे.