Bank of Maharashtra old notes notification: सोशल मीडियावर सध्या एका मेसेजने चांगलाच धुमाकूळ घातला असून त्यामुळे पुन्हा एकदा नोटबंदी होणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. या मेसेजनुसार 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा येत्या 30 जूननंतर कागदाचा तुकडा होणार, अशा दाव्याने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका कथित पत्राचा हवाला देत 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरत आहेत. पुन्हा एकदा नोटाबंदी होणार की काय, अशा भीतीने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच, आता स्वतः बँकेने समोर येत या व्हायरल मेसेजमागचे धक्कादायक सत्य उघड केले आहे.
बँकेने काय सांगितलं?
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर या संपूर्ण प्रकरणाची सत्यता मांडत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, आमच्या कोणत्याही शाखेत 2005 पूर्वीच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असा पसरवला जाणारा मेसेज पूर्णपणे खोटा, भ्रामक आणि दिशाभूल करणारा आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने अशा कोणत्याही स्वरूपाचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि हे फेक मेसेज पुढे पाठवून समाजात संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन बँकेने केले आहे.
( नक्की वाचा : Income Tax: पैशांची होणार मोठी बचत! या 7 कमाईवर लागत नाही एक रुपयाचाही टॅक्स; आयटीआर भरण्यापूर्वी नक्की वाचा )
नेमका काय होता तो मीडिया रिपोर्ट?
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, बँक ऑफ महाराष्ट्रने अंतर्गत परिपत्रक काढून या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि लवकरच इतर बँकाही असाच निर्णय लागू करणार आहेत. या रिपोर्टनंतर सोशल मीडिया युजर्सने आधीच्या नोटाबंदीचे दाखले देत चर्चा सुरू केल्या होत्या. मात्र, बँकेने वेळेतच अधिकृत भूमिका जाहीर केल्यामुळे या कयासबाजीला आता पूर्णविराम मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही (आरबीआय) असा कोणताही फतवा काढलेला नाही.
रिझर्व्ह बँकेचा नेमका नियम काय सांगतो?
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा जुना नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. आरबीआयने वर्ष 2016 मध्येच स्पष्ट केले होते की, वर्ष 2005 पूर्वीच्या गांधी सिरीजच्या नोटा आता चलनात खूप कमी प्रमाणात उरल्या आहेत. कोणाकडे अशा जुन्या नोटा असतील, तर त्या बदलून देण्यासाठी बँकांमध्ये विशेष सुविधा आहे. परंतु, हे करतानाच या नोटा कायदेशीरदृष्ट्या बाजारात पूर्णपणे वैध राहतील आणि त्यांचे मूल्य कायम असेल, असे आरबीआयने स्पष्ट केले होते. नकली नोटांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी नवीन नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवली जात आहेत, पण जुन्या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश नाही.