रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

How to claim for Train Travel Insurance  आपल्या देशात रोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. देशात आजवर रेल्वे अपघाताच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सोमवारी कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं मागून धडक दिली. या अपघातामध्ये आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे.  

रेल्वे अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना इन्शुरन्स सुविधा दिली जाते. रेल्वे तिकीट बुक करताना तुम्ही काही पैशांमध्ये या सुविधांचा फायदा घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला भक्कम कव्हर आणि क्लेम मिळते. काय आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स ? तुम्ही कसं क्लेम करु शकता? हे पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी झाली सुरुवात?

भारतीय रेल्वेनं सप्टेंबर 2016 मध्ये प्रवाशांसाठी ऐच्छिक ट्रॅव्हल इन्शुरन्सला सुरुवात केली. त्यावेळी या इ्न्शुरन्सचे प्रीमियम 92 पैसे होते. सरकारकडून हे पेमेंट केले जात होते. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये हे प्रीमियम कमी करुन प्रत्येक प्रवाशांसाठी 42 पैसे करण्यात आले. काही काळापूर्वी हे प्रीमियम 35 पैसे होते.  भारतीय रेल्वेनं त्यामध्ये वाढ करुन हे 45 पैसे केलं आहे. 

कसा करावा क्लेम ?

IRCTC च्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुक केलं तर प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळते. ही ऐच्छिक सुविधा आहे.  तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही संबंधित वेबसाईटवर नॉमिनी डिटेल्समध्ये नॉमिनीचे नाव, मोबाईल नंबर, वय, नातं ही माहिती भरा. त्यानंतर एखादी दुर्घटना घडली तर प्रवासी या इन्शूरन्सचा क्लेम करु शकतात. 

Advertisement

( नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक; 9 जणांचा मृत्यू )
 

कुणाला मिळते इन्शुरन्स?

रेल्वेतील सर्व कॅटेगरीमध्ये म्हणजेच फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर किंवा चेअर कार तसंच कन्फर्म आणि RAC तिकिटांवर हा इन्शुरन्स मिळतो. नव्या बदलानुसार लहान मुलांच्या अर्ध्या तिकीटावर ही पॉलिसी लागू नाही. फक्त फुल तिकीटावरच ही पॉलिसी मिळते. काऊंटरवर तिकीट बुक केलं तर ही सूविधा मिळत नाही. तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट खरेदी करत असाल तर त्यांना हा पर्याय निवडण्यास नक्की सांगा. या पद्धतीनं तुम्ही ऑफलाईन देखील इन्शूरन्स घेऊ शकता.   

कोणत्या घटनांमध्ये मिळतो क्लेम?

एखादी रेल्वे रुळावरुन घसरली आणि त्यामध्ये प्रवासी जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर या इन्शुरन्सचा क्लेम करता येतो. दोन रेल्वेची धडक झाल्यानंतर प्रवाशाचं शारीरिक किंवा मानसिक नुकसान झालं असेल तरी क्लेम करता येईल. रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये प्रवाशांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तरी तुम्ही क्लेम करु शकता.

Advertisement

कधी मिळत नाही क्लेम?

रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अथवा, त्याची मानसिक स्थिती नीट नसल्यानं तो कोणत्याही कारणामुळे रेल्वेतून पडला किंवा त्याचा मृत्यू झाला तर रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही.  या प्रकारच्या घटनांमध्ये  इन्शुरन्सचा क्लेम करता येत नाही.  

किती मिळतो क्लेम?

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार किमान 10 लाखांपर्यंत क्लेम मिळू शकतो. रेल्वे अपघातानंतर 4 महिन्यांपर्यंत क्लेम करता येतो. IRCTC नं दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाते. 

Advertisement

- एखाद्या प्रवाशाचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत मिळू शकते
- एखादा प्रवासी पूर्ण अपंग झाला तर त्यालाही 10 लाख रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळतो
- काही काळापुरते स्थायी अपंगत्व आले तर 7.5 लाख रुपयांची मदत मिळते
-  रेल्वे अपघातामध्ये एखादा प्रवासी गंभीर जखमी झाला असेल तर त्याचे कुटुंबीय 2 लाखांपर्यंतचा क्लेम करु शकतात.
- एखाद्या प्रवाशाचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह घरी आणण्यासाठी ट्रान्सपोर्टची आवश्यकता असेल तर 10000 रुपयांपर्यंतची मदत मिळते.