Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Budget 2025) संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. करमुक्त उत्पनाची मर्यादा वाढवण्याची मध्यमवर्गीयांची मागणी अर्थमंत्र्यांनी मान्य केली. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ड्रीम बजेट सादर केलं आहे. इन्कम टॅक्समधील सवलत 7 लाखांवरुन 12 लाख करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा मध्यमवर्गाला, नोकरदार तसंच नवतरुणांना होणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात रक्कम राहणार आहे. ही रक्कम खर्च केल्यानंतर बाजारपेठेतील मागणी वाढणार असून त्याचा फायदा सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना फायदा होऊ शकेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या अर्थसंकल्पात करसवलतीबाबत घेतलेला निर्णय हा अतिशय बोल्ड असून तो भारताच्या अर्थव्यवस्थेत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्रात शंभर जिल्हे निश्चित करुन त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णयाचं स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलं. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. मासेमारी करणाऱ्यांचे क्रेडीट लिमिट 3 लाखांवरुन 5 लाख करण्यात आली आहे. हे लिमिट बिनव्याजी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Union Budget 2025 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त )
महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. त्या स्टार्टअपकरता 20 कोटीपर्यंतची क्रेडिट लिमिट करण्यात आली आहे, त्याचा नवतरुणांना आणि स्टार्टअपना फायदा होईल. PPP क्षेत्रातील नव्या योजनेमुळे खासगी क्षेत्राची गुंतवणूक पायाभूत क्षेत्रांमध्ये वाढेल त्यामधून रोजगाराची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरुणांसाठी वेगवेगळे मिशन या बजेटमध्ये सादर करण्यात आले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारा आहे. 21 शतकातील हा अर्थसंकल्प सर्वात महत्त्वाचा अर्थसंकल्प असून विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. भारताला गतीनं पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे. भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडं चाललेला आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातून आपल्याला पाहायला मिळतात, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.