Union Budget 2025 10 Key Points: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना 12 लाखांपर्यंतची करमुक्ती देण्यात आली आहे. त्याचबरोबर शेती, पर्यटन, आरोग्यव्यवस्था याबाबत सर्वात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. काय आहेत 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा? वाचा सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. देशाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 'पंतप्रधान धनधान्य योजने'चा समावेश आहे. राज्य सरकारांच्या मदतीने ही योजना राबवली जाणार असून देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या महत्त्वाच्या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.
2. शेतकऱ्यांसाठी दुसरी आनंदवार्ता म्हणजे किसान क्रेडीट कार्डच्या योजनेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज, कापूस व्यवसायाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
3. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.12 लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही, अशी मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांचे उत्पन्न 18 लाखांच्या वर आहे त्यांना 70 हजारांची सूट आणि 25 लाखांच्या उत्पन्नावर 20 हजारांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4. अर्थसंकल्पामध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून वैद्यकीय महाविद्यालयात 10 हजार जागा वाढवण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतला आहे. तसेच मेडिकल कॉलेजसाठीही मोठी तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
5. पहिल्यांदाच व्यवसाय करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकांना सरकार 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. त्यामुळे नव्याने व्यवसाय उभारणाऱ्या महिलांसाठी सरकारकडून हा मोठा दिलासा देण्यात आला आहे.
( Union Budget 2025 : पुढच्या आढवड्यात नवे आयकर विधेयक सादर केले जाणार )
6. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी या अर्थसंकल्पामधून सर्वात मोठे गिफ्ट देण्यात आलं आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये 200 डे केअर सेंटर उघडले जातील, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर सेंटर सुरु केली जाणार आहेत. तसेच जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी होतील, ज्यामध्ये 36 औषधांचा समावेश आहे.
7. मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामधून पर्यटन क्षेत्रासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकारकडून 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. तसेच खेळणी बनवण्याच्या व्यवसायालाही चालना देण्यात येणार आहे.
8. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधे आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत.
9. बिहारमध्ये मखानाचे उत्पादन आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, अशी घोषणा सीतारमण यांनी केली. मखना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचबरोबर संबंधित शासकीय योजनांचा लाभही शेतकऱ्यांना दिला जाईल.
10. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवे आयकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. या नव्या आयकर विधेयकामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील, विशेषतः कर प्रणालीत मोे बदल होतील, असे संकेतही त्यांनी दिलेत.
( नक्की वाचा : Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली; 'पंतप्रधान धनधान्य योजने'ची घोषणा )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world