Jagannath Rath Yatra : प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सेवा दिल्यानंतर, आता अदाणी समूह ओडिशातील पुरी येथे सुरु असलेल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत सेवा सुरु केली आहे. या रथयात्रेत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना, सेवकांना तसेच सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना अदाणी समूह भोजन देणार आहे. अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
सेवा हीच साधना
गौतम अदाणी यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये 'सेवा हीच साधना' आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं की, 'महाप्रभू श्री जगन्नाथजींच्या असीम कृपेने, आम्हाला पुरी धामच्या पवित्र रथयात्रेत सेवा देण्याचे सौभाग्य लाभले आहे. आजपासून सुरु झालेली ही दिव्य यात्रा तो क्षण आहे, जेव्हा स्वतः भगवान आपल्या भक्तांमध्ये येऊन त्यांना दर्शन देतात. ही केवळ एक यात्रा नसून, भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनुपम उत्सव आहे.
या पुण्यप्रसंगी, लाखो भाविकांच्या सेवेसाठी अदाणी परिवार पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने समर्पित आहे. प्रत्येक भक्ताला स्वच्छ, पौष्टिक आणि प्रेमाने वाढलेले भोजन मिळावे, याच संकल्पाने पुरी धाममध्ये आम्ही 'प्रसाद सेवा' सुरू केली आहे.
पुरीच्या या पुण्यभूमीवर एक सेवक म्हणून जोडले जाणे हे माझ्यासाठी आणि समस्त अदाणी परिवारासाठी अत्यंत गौरव आणि समाधानाची बाब आहे. मी प्रार्थना करतो की महाप्रभू श्री जगन्नाथजींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. नर सेवा ही नारायण सेवा आहे आणि सेवा हीच साधना आहे.'
रथयात्रेविषयी माहिती
पुरी येथील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिरात दरवर्षी होणारी रथयात्रा जगभरात प्रसिद्ध आहे, ज्यात लाखो भक्त सहभागी होतात. हा नऊ दिवसांचा उत्सव यावर्षी २६ जून ते ८ जुलै पर्यंत चालणार आहे. २७ जून रोजी रथयात्रेला सुरुवात झाली आहे. यात देश-विदेशातून लोक भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी येतात.