फेसबुक संस्थापक आणि मेटा कंपनीचे सीईओ मार्क झकरबर्ग (Mark Zuckerberg ) यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याचं केंद्र सरकारनं जोरदार खंडन केलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी या विषयावर झकरबर्गला दिलेली माहिती निराशाजनक असल्याचं म्हंटलं आहे. झकरबर्गनं तथ्यांच्या आधारावर विश्वासनीयता कायम ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झकरबर्ग यांनी 2024 मध्ये जगभरात झालेल्या निवडणुकांवर केलेलं वक्तव्य सध्या गाजत आहे. त्यामध्ये त्यांनी 2024 हे वर्ष जगभर उलथापालथीचं वर्ष होतं. कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगातील अनेक देशांमधील सरकार बदललं, असं वक्तव्य केलं होतं.
अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर लिहिलं की, 'जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतामध्ये 2024 मध्ये 64 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. भारतीय नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. झकरबर्गनं 2024 मधील निवडणुकांमध्ये भारतासह बहुतेक सरकारचा पराभव झाला असा दावा केला. जो तथ्यात्मक दृष्टीनं चूक आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी पुढं सांगितलं की, 'कोव्हिड दरम्यान 800 दशलक्ष लोकांना मोफत जेवण, 2.2 अब्ज लोकांना मोफत लस, तसंच जगभरातील देशांना मदत करण्यापर्यंत भारत एक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढं येत आहे. पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्या कार्यकाळासाठी मिळालेला निर्णायक विजय हा सुशासन आणि नागिकांच्या विश्वासाचं प्रमाण आहे. मार्क झकरबर्ग यांच्याकडून देण्यात आलेली माहीती निराशाजनक आहे. तथ्य आणि विश्वसनीयता कायम ठेवा.'
कशामुळे सुरु झाला वाद?
मार्क झकरबर्गनं 2024 मधील भारतामधील सार्वत्रिक निवडणुकांवर चुकीचा दावा केल्यानं या विषयावरील वाद सुरु झाला. जो रोगन सोबतच्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं होतं. 'कोव्हिड 19 महामारीनंतर सरकारच्या विश्वासहर्तेमध्ये घट झाल्याच्या विषयावर ते चर्चा करत होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या असंतोषाचा जगभरातील निवडणुकांवर परिणाम झाला. 2024 साली झालेल्या निवडणुकीत सर्व सत्ताधारी पराभूत झाले. त्यांनी भारतामधील निवडणुकांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा पराभव झाल्याचा दावा केला होता.
( नक्की वाचा : 'या' गावात आजारी पडण्यावर प्रशासनाकडून बंदी, महापौरांवर निर्णय घेण्याची वेळ का आली? )
झकरबर्ग म्हणाले ,' 2024 हे जगभरात निवडणुकांचं वर्ष होतं. भारतासह सर्वच देशांमध्ये निवडणुका होत्या. जवळपास सर्वच सत्ताधारी निवडणुकीत पराभूत झाले. वर्षभरात कोणत्या ना कोणत्या वैश्विक घटना घडल्या. महागाईमुळे किंवा कोव्हिडचा सामना करण्यासाठी झालेल्या आर्थिक धोरणांमुळे किंवा सरकारनं कोव्हिडला ज्या पद्धतीनं हाताळले त्यामुळे असं वाटतं की याचा प्रभाव जागतिक होता.'