दहावीची परीक्षा हा शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेचं महत्त्व लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेणार आहे. 2026 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनदा बोर्डाची परीक्षा घेण्यात येईल, असं सीबीएसईनं बुधवारी (25 जून) जाहीर केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 (NEP-2020) मध्ये या योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होका. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा बोर्ड परीक्षा देण्याची संधी मिळेल. त्यापैकी एक मुख्य परीक्षा असेल तर दुसरी परीक्षेत त्यांना पूर्वीच्या परीक्षेतील कामगिरीची सुधारणा करता येईल.
देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील हे एक क्रांतीकारक धोरण आहे. सीबीएसई बोर्ड दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा कशा पद्धतीनं घेईल? त्यासाठी काय नियम आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
कधी होणार परीक्षा?
मुख्य किंवा पहिली परीक्षा सध्याप्रमाणेच फेब्रुवारीच्या मध्यात सुरू होईल. दुसरी परीक्षा मे महिन्यात आयोजित केली जाईल. अंतर्गत मूल्यांकन (Internal assessment) फक्त एकदाच, मुख्य परीक्षेपूर्वी केले जाईल.
तीन विषय आवश्यक!
CBSE ने सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या बोर्ड परीक्षेत बसणे अनिवार्य केले आहे. उत्तीर्ण झालेल्या आणि पात्र विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारण्याची परवानगी दिली जाईल. एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांमध्ये हजेरी लावली नसेल, तर त्याला/तिला दुसऱ्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
( नक्की वाचा : Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चप्पलवरून सोशल मीडियावर राडा, लग्झरी ब्रँडवर का संतापले नेटीझन्स? )
पहिली परीक्षा दिली नाही तर...
एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांमध्ये हजेरी लावली नसेल, तर त्याला/तिला दुसऱ्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना "Essential Repeat" श्रेणीत ठेवले जाईल. ते पुढील वर्षाच्या फेब्रुवारीतील मुख्य परीक्षेतच बसू शकतील.
ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या परीक्षेचा निकाल 'कंपार्टमेंट' श्रेणीत आहे. म्हणजेच मुख्य बोर्ड परीक्षेत एक किंवा दोन विषयांत विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला त्याच श्रेणीत दुसऱ्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषयांना परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विषयात बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अभ्यासक्रम आणि निकाल
- CBSE च्या दोन्ही दहावी बोर्ड परीक्षा वर्षासाठी निर्धारित केलेल्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील. अभ्यास योजना आणि परीक्षा योजना तशीच राहील.
- CBSE पहिल्या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करेल.
- मुख्य परीक्षेतील विद्यार्थ्याची कामगिरी DigiLocker मध्ये उपलब्ध केली जाईल. विद्यार्थ्याला सुधारणेसाठी दुसऱ्या परीक्षेत बसायचे नसेल, तर याचा उपयोग अकरावीमध्ये प्रवेशासाठी करता येईल.
- दुसऱ्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र (passing document) दिले जाईल. गुणवत्ता प्रमाणपत्र (merit certificate) देखील दुसऱ्या परीक्षेनंतरच दिले जाईल.
- फोटोकॉपी, पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा दोन्ही परीक्षांसाठी (म्हणजे मुख्य आणि दुसरी) दुसऱ्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच उपलब्ध असतील.
- CBSE ने सांगितले की, मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत तात्पुरता प्रवेश दिला जाईल. त्यानंतर त्यांचा प्रवेश दुसऱ्या परीक्षेच्या निकालावर आधारित असेल.