Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video

ढगफुटी होण्यापूर्वी इथं तीन ते चार मजली इमारती उभ्या होत्या. पण ढगफुटीनंतर या उंच इमारतींचं फक्त छत दिसत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये धराली हे गाव आहे. या गावावर निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. पण हाच निसर्ग जेव्हा आक्राळविक्राळ रुप धारण करतो, तेव्हा हृदयाचा थरकाप उडतो. उत्तर काशीच्या धराली गावात अशीच दुर्घटना घडली आहे. धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर खीरगंगा नदीने संपूर्ण गाव गिळलं आहे. काही क्षणांपूर्वी हे गाव दिमाखात उभं होतं. पण खीरगंगा नदीतून वाहत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याने क्षणात होत्याचं नव्हतं केलं. 

धराली गाव हे डोंगराच्या पायथ्याशी वसलं आहे. या गावात साधारण 40-50 घरं असतील. गावाच्या मधून ही खीरगंगा नदी वाहते. या नदीने गावाला दोन भागात विभागलं आहे. जेव्हा डोंगराच्या माथ्यावर ढगफुटी झाली. तेव्हा डोंगरमाथ्यावर भूस्खलन झालं, आणि मातीचा ढिगारा नदीतून वाहत खालच्या बाजुला आला. त्यानंतर नदीने डाव्या बाजुला वळण घेतलं आहे. त्यामुळे पाण्यासोबत आलेला ढिगारा याच वळणावर जमा होतं गेला. नदीच्या उजव्या बाजुला असलेली घरं या ढिगाऱ्याखाली दिसेनाशी झाली. 

Advertisement

नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काहींनी याचा व्हिडीओ ही बनवला. हा व्हीडीओ ज्यांनी बनवला त्याच कुटुंबाची अवस्था ही वाईट झाली आहे. कुटुंबातील काही नातेवाईक इथे हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य खाली गाडीमध्ये थांबले होते. गाडी डोंगराच्या पायथ्याशी होती. पण त्यांना वरून मातीचा ढिगारा वाहत येतोय याची माहिती नव्हती.  व्हिडीओ बनावणारी माणसं त्यांना फोन करायला सांगत होते. त्यांचे नशिब चांगले होते त्यामुळे  गाडी अवघी दहा सेकंदाच्या फरकाने वाचली. 

ढगफुटी होण्यापूर्वी इथं तीन ते चार मजली इमारती उभ्या होत्या. पण ढगफुटीनंतर या उंच इमारतींचं फक्त छत दिसत होते. काही बंगले तर प्रवाहासोबत बाजुला फेकले गेले होते. ढगफुटीनंतर अवघ्या 35 सेकंदात गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली आलं होतं. 35 सेकंदात या घरांमधली माणसं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काय करणार? ज्यांना ढगफुटी झाल्याचा अंदाज आला त्यांनी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न केला असेल. पण किती जणांना स्वत:चा जीव वाचवता आला याची माहिती अजून मिळालेली नाही. दुर्घटनेनंतर सैन्याचे जवान आणि एनडीआरएफची पथकं मदतकार्यासाठी दाखल झाली आहेत.

धराली गावातून नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पाठवलं जातं आहे. जवान मातीचे ढिगारे उपसून नागरिकांचा शोध घेत आहेत. गावकरी अजुनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सगळ्यांच्या नजरा कोण वाचलं? आणि आपण कोणाला गमावलं? याचाच शोध घेत आहे. पण त्या 35 सेकंदांनी संपूर्ण गाव गिळलं. हा धक्का गावकऱ्यांना पचवता येत नाही. उत्तराखंडमध्ये या आधी ही अशा घटना घडल्या आहेत.