- मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील नर्मदा नदीत चैत्र नवरात्रीच्या महाअभिषेकात ११,००० लिटर दूध ओतले गेले
- या धार्मिक अनुष्ठानात २१ दिवस चालणारे शिवमहापुराण कथा आणि महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते
- भक्तांचा असा विश्वास आहे की नर्मदा ही त्यांची माता आहे दूध अर्पण हा त्यांचा वैयक्तिक धार्मिक श्रद्धेचा भाग आहे
Narmada Milk Waste: मध्य प्रदेशची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नर्मदा नदीत चक्क 11,000 लिटर दूध ओतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रद्धेपोटी केलेल्या या 'महाअभिषेका'मुळे आता समाजमाध्यमांवर दोन गट पडले आहेत. एकीकडे याला धार्मिक परंपरा मानले जात आहे, तर दुसरीकडे संसाधनांची नासाडी म्हणून टीका केली जात आहे. एकीकडे 'नर्मदे हर'चा जयघोष आणि दुसरीकडे कुपोषित बालकांचा टाहो, असे विदारक चित्र मध्य प्रदेशात पाहायला मिळत आहे. सीहोरमध्ये महाअभिषेकासाठी 11,000 लिटर दूध थेट नदीत ओतण्यात आले. याचे व्हिडिओ व्हायरल होताच सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. "हेच दूध गरिबांना दिले असते तर देवाचा आशीर्वाद मिळाला नसता का?" असा सवाल नेटकरी विचारत आहेत. भक्ती आणि सामाजिक जबाबदारी यातील संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सीहोर जिल्ह्यातील सतदेव गावातील आहे. येथे श्री दादाजी दरबार पातालेश्वर महादेव मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्त 21 दिवसांचे मोठे अनुष्ठान आयोजित करण्यात आले होते. 18 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान चाललेल्या या कार्यक्रमात शिव महापुराण कथा आणि महायज्ञ करण्यात आला. या आयोजनासाठी 5 एकरचा भव्य पंडाल उभारण्यात आला होता. 41 टन पूजन सामग्रीचा वापर करण्यात आला. पण याच ठिकाणी ज्यावेळी नर्मदा नदी अकरा हजार लिटर दूध सोडण्यात आले त्यावेळी सर्वांचेच लक्षा या ठिकाणीकडे गेले.
नक्की वाचा - Traffic Jam: समृद्धी महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा! अपघाताचा धोका वाढला, RTO चे दुर्लक्ष, Video Viral या वादाचे मुख्य केंद्र ठरला तो म्हणजे नर्मदा नदीत अर्पण केलेला 11,000 लिटर दुधाचा अभिषेक. भक्तांच्या मते, ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा असून त्यांनी स्वतःच्या संसाधनातून हे अर्पण केले आहे. दररोज 151 लिटर आणि एका विशेष दिवशी 11,000 लिटर दुधाने नर्मदा मैय्येचे पूजन करण्यात आले. भाविकांच्या मते, नर्मदा ही त्यांची माता असून अशा अनुष्ठानांना तर्काच्या चौकटीत पाहणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कृत्य योग्य आहे. त्याचे समर्थन भक्त करत आहेत. पण त्याच वेळी याच राज्यात कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे याचा त्यांना विसर पडला आहे का असा प्रश्न ही या निमित्ताने उपस्थित होत आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील कुपोषणाची आकडेवारी पाहता या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. हायकोर्टात सादर केलेल्या एका याचिकेनुसार, राज्यात 10 लाखाहून अधिक मुले कुपोषित आहेत. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणात दूध नदीत वाहून घालण्याऐवजी ते गरीब मुलांना दिले असते, तर ती खरी सेवा ठरली असती, असे मत पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आहे. तसेच, नदीत मोठ्या प्रमाणात दूध टाकल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.