- पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथील वॉटरपार्कमध्ये सुरक्षिततेचा अभाव उघडकीस आला आहे
- वॉटर स्लाइडवरून घसरलेल्या अश्विनी नप्ते यांच्या पाठीचे चार मणके तुटले आहेत
- अपघाताच्या वेळी पर्यटन केंद्रात कोणतीही प्राथमिक वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती
अविनाश पवार
उन्हाच्या झळा सर्वांनाच बसण्यास सुरूवात झाली आहे. अशा वेळी अनेक जणांची पावलं वॉटरपार्कडे वळतात. मोठ्या प्रमाणात या काळात वॉटरपार्कमध्ये गर्दी पाहायला मिळते. पण याच वॉटरपार्कमध्ये एक छोटी चुक तुम्हाला आयुष्यभर जागेवर बसवू शकते. अशीच घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मोराची चिंचोली येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये सुरक्षिततेचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. स्लाइडवरून खाली पडल्याने या महिलेचे अर्धांग निकामी झाले आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करंदी येथील अश्विनी संदीप नप्ते (वय 37) या आपल्या कुटुंबासह सहलीसाठी मोराची चिंचोली इथं गेल्या होत्या. त्या इथं असलेल्या वॉटर स्लाइडचा आनंद घेत होत्या. पण हीच वॉटर स्लाइड त्यांना कायमची जागेवर बसवणार आहे याचा विचार ही त्यांनी केला नसेल. वॉटर स्लाइडवरून घसरताना खाली असलेल्या पुलामध्ये पाण्याची पातळी अत्यंत कमी होती. त्यामुळे अश्विनी या थेट जमिनीवर जोरात आपटल्या. त्यानंतर त्या जागीच बेशुद्ध पडल्या. या भीषण अपघातात त्यांच्या पाठीचे 4 मणके तुटले आहेत. डॉक्टरांनी त्यांचे कमरेखालचे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे सांगितले आहे.
घटनेच्या वेळी पर्यटन केंद्रात कोणतीही प्राथमिक वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. जखमी अश्विनी यांना त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः खासगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. वॉटरपार्क प्रशासनाने सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि पर्यटकांच्या जिवाशी खेळ केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आनंदाच्या सहलीचा शेवट मात्र भीषण झाला. थोड्या वेळाचा आनंद लुटण्यासाठी आलेलं नप्ते कुटुंब या घटनेनं हादरून गेले आहे. असं काही तरी होईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल.
या प्रकरणी किरण नप्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन सुट्ट्यांच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. उन्हाळ्यात वॉटरपार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाने ही त्यावर लक्ष देण्याची गरज आता बोलून दाखवली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये जायचं की नाही असा विचार अनेक जण करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world