Explainer : वीज नेहमी झाडांवर किंवा माणसांवर का पडते? वीज निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोप्या भाषेत!

'या' भागात प्रत्येक मिनिटाला इथे 28 वेळा वीज चमकते असं म्हटलं जातं. म्हणजेच एका रात्री तब्बल ४० हजार वेळा इथं वीज चमकतात. 

जाहिरात
Read Time: 5 mins

मान्सून यंदा 21 मे किंवा 22 मेला केरळमध्ये दाखल होईल, असा ताजा अंदाज आहे. पावसाचं मनमुराज स्वागत करायला आपण तयार आहोत, पण पाऊस तोंडावर आलेला असताना आपण थोडी तयारीही करायला हवी. महापालिका, सरकार त्यांच्या पातळीवरची तयारी करेलच, पण आपण नागरिक म्हणून पावसाळ्यात थोडी खबरदारी घ्यायला हवी.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

तुफान, जोरदार, मुसळधार पाऊस सुरू झाला की त्या पावसात एक थोडासा भीतीदायक फॅक्टर असतो. तो फॅक्टर म्हणजे वीज. आकाशात वीज चमकली, आकाशातून जमिनीवर वीज पडली की आपल्याला थोडीशी भीती वाटतेच. पावसाळ्यात चमकणाऱ्या विजेभोवती थोडं गूढ आहे, थोडं कुतूहल आहे आणि थोडी भीतीसुद्धा आहे. भीती यासाठी की, ही आकाशातून कोसळणारी वीज दरवर्षी कित्येक बळी घेते. आपण थोडीशी काळजी घेतली, थोडीशी खबरदारी घेतली तर वीजेमुळे होणारे हे मृत्यू आपण नक्की टाळू शकू. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

वीज म्हणजे नेमकं काय? 
 पावसात काळ्याकुट्ट आकाशात लखकन चमकणारी वीज ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. वीज कोसळणं म्हणजे इलेक्ट्रॉमॅग्नेटिक क्रिया. ढगांमध्ये साचलेल्या पाण्याच्या थेंबांचं घर्षण, बर्फ आणि इतर कण एकमेकांना घासल्यामुळे वीज तयार होते. या प्रक्रियेत, ढगांमध्ये सकारात्मक (positive) आणि नकारात्मक (negative) प्रभार तयार होतात. आकाशात तयार झालेली वीज आणि जमीन हे पॉझिटीव्ह निगेटीव्ह पोल एकमेकांकडे आकर्षित होतात. आणि म्हणूनच वीज जमिनीवर कोसळते.

Advertisement


आता वीज चमकत असताना कायम सांगितलं जातं की झाडाखाली उभं राहू नका, मात्र बऱ्याच वेळा पावसापासून आसरा घेण्यासाठी झाडांकडे धाव घेतली जाते. वीज नेहमी झाडांवर किंवा माणसांवर का पडते. तर त्याची काही कारणं आहेत. वीज ज्यावेळी आकाशातून पडते, त्यावेळी ती वाहण्यासाठी एक वाहक म्हणजे कंडक्टर शोधते. वीज ही प्रामुख्यानं उचं वस्तूंवर पडते. झाडं आणि माणसं हे वीजेचे गुड कंडक्टर म्हणजे चांगले वाहक आहेत. 
त्यामुळे वीज जमिनीवर पडताना झाडं आणि माणसांवर पडते. ही चमकणारी वीज भयानक विनाशकारी आहे. त्याची ताजी तीन उदाहरणं महाराष्ट्रात समोर आली आहेत.

राज्यात मान्सून अजून दाखलही झाली नाही, तोच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीज कोसळून मोठं नुकसान झालंय. हिंगोलीत एका घरावर वीज पडली, वीज पडल्यानं घरातली विद्युत उपकरणं जळून गेली. त्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय. तिकडे धुळ्यामध्ये वीज पडून बैलजोडी ठार झाली. छोटू माळी या शेतकऱ्याची ही बैलजोडी होती. तर लातूरच्या इंदरठाणामध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा शेतकरी शेतात काम करत असताना त्याच्यावर वीज कोसळली. म्हणजे महाराष्ट्रातल्या मान्सूनपूर्व पावसात पडलेल्या या वीजांमुळे माणसाचा मृत्यू झालाय, प्राण्यांचा बळी गेलाय आणि मालमत्तेचंही नुकसान झालंय.

नक्की वाचा - Delhi Rain : मेट्रोचं छप्पर उडालं, भिंत पडली... जोरदार वादळ आणि पावसामुळे दिल्लीची कशी झाली अवस्था? Video

भारतात दरवर्षी दोन ते अडीच हजार लोकांचा वीज पडून मृत्यू

  • १९६७ पासून २०१९ पर्यंत १ लाखापेक्षा अधिक लोकांचा वीज पडून मृत्यू   
  • यावर्षी मार्च २०२५ ते एप्रिल २०२५ या एका महिन्यात १२ भारतीय राज्यांमध्ये वीजा कोसळल्या 
  • त्यामध्ये १६२ जण दगावलेत 
  • गेल्या वर्षी मार्च २०२४ ते एप्रिल २०२४ दरम्यान ५७ मृत्यू झाले होते 
  • यंदा या मृत्यूंमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ झालीय 
  • देशात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये जवळपास २७ टक्के मृत्यू हे महाराष्ट्रातले असतात
  • दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरांचा वीज पडल्यामुळे जीव जातो 
  • महाराष्ट्राबरोबरच बिहारमध्ये वीज पडून सर्वाधिक मृत्यू होतात...
  • बिहारला वीज कोसळण्याचा हॉटस्पॉट म्हटलं जातं...

बिहारमधलं वातावरण, ग्रामीण लोकसंख्या, वीजेपासून बचावासाठीचे मर्यादित उपाय आणि हिमालयापासूनचं अंतर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बिहारमध्ये जास्त वीजा कोसळतात. बिहारमधल्या वातावरणात जास्त आर्द्रता आहे. हिमालय जवळ असल्यानं तिथून वाहणारे थंड वारे हे बिहारमधल्या उष्ण आणि आर्द्रता असलेल्या हवेशी धडकल्यामुळे विजा तयार होण्यासाठी हे वातावरण पोषक ठरतं. बिहारमध्ये जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि शेतात काम करते. विजांपासून बचाव करण्यासाठी पुरेसे उपाय आणि जागरुकता या दोन्हीवर बिहारमध्ये लक्षच दिलं जात नाही. वीज पडण्याचा इशारा देऊनसुद्धा त्याकडे बिहारमधले शेतकरी दुर्लक्ष करतात. वातावरणात सतत होणारे बदल, मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस आणि जमिनीत असलेला ओलावा या सगळ्यामुळे बिहारमध्ये वीज कोसळण्याच्या जास्त घटना घडतात. 

बऱ्याच वेळा हवामान विभाग विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा देतं. हा इशारा गांभीर्यानं घ्यायची गरज आहे. विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी या इशाऱ्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपल्याला वीजेशी लढण्याची जी तयारी करायची आहे, ती नेमकी कशी करायची ते पाहुया. 

वीज चमकत असताना तुम्ही घराबाहेर असाल तर काय कराल? 

हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी स्वतः जाऊ नका,  जनावरांनाही सोबत नेऊ नका, आणि मासेमारीसाठीसुद्धा बाहेर पडू नका

विजा चमकत असताना तुम्ही बाहेर असाल तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा 

एखाद्या बंदिस्त इमारतीमध्ये आसरा घ्या 

वीज चमकत असेल तर झाडाखाली उभे राहू नका, कारण उंच झाडांकडे वीज आकर्षित होत असते 

एखाद्या डोंगराखाली किंवा टेकडीखाली उभे राहू नका 

वीज चमकत असताना तुम्ही प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा 

सायकल, स्कूटर, उघडा ट्रॅक्टर किंवा बैलगाडीमधून प्रवास करत असाल तर प्रवास थांबवून ताबडतोब सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या

धातूच्‍या वस्‍तूंपासून लांब राहा

वीजेच्या खांबाच्या जवळ उभे राहू नका 

धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासूनही लांब राहा

विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका 


वीज चमकत असताना ग्रामीण भागांतल्या नागरिकांनी काय करावं? 

वीज चमकत असेल तर घरातच थांबा 

विशेषतः मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका

घराचं दार, खिडक्यांपासून दूर राहा 

धातूच्या वस्तूंच्या जवळ राहू नका

विजा चमकत असताना हेयरड्रायर, इलेक्ट्रिक रेझरसारखी उपकरणं वापरु नका 

विजा चमकत असताना शक्यतो वाहत्या पाण्याशी संबंधित कामं म्हणजे आंघोळ, भांडी धुणं, कपडे धुणं टाळा 

वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो, त्यामुळे शक्यतो पाण्यात काम करू नका 

इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा


वीजेबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट

व्हेनेझ्युएलामधल्या माराकायबो तलावाच्या परिसरात सर्वाधिक वीजा कोसळतात. या तलावाची भोगोलिक रचना आणि तिथलं वातावरण विजांसाठी अत्यंत पोषक आहे. वर्षातले जवळपास दीडशे रात्री इथे वीजा चमकतात. प्रत्येक मिनिटाला इथे २८ वेळा वीज चमकते. म्हणजेच एका रात्री तब्बल ४० हजार वेळा या माराकायबो तलावाच्या परिसरात वीजा चमकतात.