धार्मिक कार्यक्रमांमधील निष्काळजीपणामुळे यापूर्वीही हजारो लोकांचा गेलाय बळी, जाणून घ्या कुठे-कुठे झाले होते अपघात

अलिकडील वर्षांमध्ये देशातील मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या मोठ्या घटनांबाबतची माहिती जाणून घेऊया.

Advertisement
Read Time: 4 mins

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. मंदिर आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांमुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर धार्मिक स्थळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रातील मांढरदेवी मंदिरामध्ये वर्ष 2005मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 340 तर 2008मध्ये राजस्थानातील चामुंडा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 250 लोकांचा मृत्यू झाला होता. 

(नक्की वाचा: भीषण दुर्घटना! सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू)

हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात 2008मध्ये देखील धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 162 लोकांचा बळी गेला होता. अलिकडील काही वर्षांत देशातील मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांची माहिती जाणून घेऊया... 

  • 31 मार्च 2023: इंदुर शहरातील एका मंदिरामध्ये रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हवन कार्यक्रमादरम्यान एका प्राचीन पायरीवर बांधलेला स्लॅब कोसळून 36 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1 जानेवारी 2022: जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध माता वैष्णो देवी मंदिरामध्ये भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 12 जणांचा मृत्यू झाला आणि 12 हून अधिक लोक जखमी झाले.
  • 14 जुलै 2015: आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जिल्ह्यात पुष्करम उत्सवाच्या पहिल्या दिवशी गोदावरी नदीच्या काठावर प्रमुख स्नान विधीच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत 27 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले.
  • 3 ऑक्टोबर 2014: दसरा उत्सव संपल्यानंतर पाटणा येथील गांधी मैदानामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जणांचा मृत्यू तर 26 जण जखमी झाले.
  • 13 ऑक्टोबर 2013: मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ नवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक जखमी झाले. भाविक ओलांडत असलेल्या नदीचा पूल कोसळल्याची अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली.
  • 19 नोव्हेंबर 2012: पाटणा येथील गंगा नदीच्या काठावरील अदालत घाट येथे छठपूजेदरम्यान तात्पुरता बांधलेला पूल कोसळून झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 20 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले.
  • 8 नोव्हेंबर 2011: हरिद्वारमधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या हरकी पायडी घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत 20 जणांचा मृत्यू झाला.
  • 14 जानेवारी 2011: केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील पुलमेडू येथील सबरीमाला मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या जीपला बसलेल्या धडकेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 104 भाविकांचा मृत्यू तर 40 हून अधिक जखमी झाले.
  • 4 मार्च 2010: उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 63 लोकांचा मृत्यू झाला.  
  • 30 सप्टेंबर 2008: राजस्थानमधील जोधपूर शहरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्बस्फोट झाल्याच्या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 250 भाविकांचा मृत्यू तर 60 हून अधिक जखमी झाले.
  • 3 ऑगस्ट 2008: हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील नैना देवी मंदिरावर दरड कोसळल्याच्या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 162 लोकांचा मृत्यू तर 47 जखमी झाले.
  • 25 जानेवारी 2005: महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी मंदिराच्या वार्षिक यात्रेदरम्यान 340 हून अधिक भाविकांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू तर शेकडो लोक जखमी झाले होते. 
  • 27 ऑगस्ट 2003: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्यात पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू तर 140 लोक जखमी झाले.

(नक्की वाचा: प्रचंड गर्दी, उन्हाळा आणि बाहेर जायला... हाथरस दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव)

हाथरसमधील दुर्घटनेमुळे संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक समिती स्थापन केली आहे. बुधवारी (3 जून) ते स्वत: हाथरस येथे जाऊन पीडितांची भेट घेणार आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा: कोण आहेत संत भोले बाबा? ज्यांच्या सत्संगमध्ये झाली चेंगराचेंगरी, जाणून घ्या पूर्ण घटना)

आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांमध्ये प्रशासनाची भूमिका अत्यंत ढिसाळ असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणतीही चौकशी न करता कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली जाते. अपेक्षेपेक्षा जास्त लोक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, अशी परिस्थिती हाताळण्यास प्रशासन पूर्णपणे तयार नसते. सुरक्षेशी तडजोड केल्याचे अनेक कार्यक्रमांदरम्यान दिसून येते. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, सुरक्षा कर्मचारी अशी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. या निष्काळजीपणामुळेच अशा दुर्घटना घडतात.

देशात धार्मिक कार्यक्रमादरम्यान असे अपघात यापूर्वीही घडले आहेत. 2023मध्ये मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदुरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी एका विहिरीचा काही भाग कोसळून 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

NDMA अहवालातील माहिती

गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 2014 साली अहवाल दिला होता. याद्वारे त्यांनी राज्य सरकार, स्थानिक अधिकारी, प्रशासन आणि आयोजकांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. 

या अहवालात गर्दी व्यवस्थापनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना प्रशिक्षण देण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे. अहवालात पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांना गर्दीचा अभ्यास करण्याचा तसेच गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकण्याबाबतची माहिती नमूद करण्यात आली होती.  

Advertisement

धार्मिक कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्था

भारतात होणाऱ्या प्रवचनांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. अनेकदा कार्यक्रमामध्ये लोकांची इतकी गर्दी होते की आयोजकांनी अपेक्षाही केलेली नसते. अशा परिस्थितीत आयोजक व्यवस्थापनेमध्ये पूर्णतः अपयशी ठरतात. 

अनेकदा कार्यक्रमांसाठी पोलिसांचा बंदोबस्त पुरेसा नसतो किंवा पोलिसांकडून परवानगीही घेतली जात नाही आणि किती भाविक येतात, याची माहितीही दिली जात नाही, असेही निदर्शनास येत असल्याने पोलीस पुरेशा प्रमाणात बंदोबस्त तैनात करू शकत नाहीत.

हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा शंभरीपार...150 जण जखमी | UP

Topics mentioned in this article