प्रचंड गर्दी, उन्हाळा आणि बाहेर जायला... हाथरस दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव

Hathras Stampede Eye Witnesses : या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या सत्संगाला उपस्थित असलेल्या काही जणांनी तिथं नेमकं काय घडलं? ही चेंगराचेंगरी का झाली? याचा अनुभव सांगितला आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins
Hathras Stampede
मुंबई:

Hathras Stampede Eye Witnesses :  उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Uttar Pradesh) भोलेबाबांचा सत्संग ऐकण्यासाठी गेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. हाथरसमधील सिंकदराऊपासून 5 किलोमीटर दूर शेतामध्ये या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चेंगराचेंगरीनंतर या परिसरात शोकाकुल वातावरण आहे. या सत्संगाला उपस्थित असलेल्या काही जणांनी तिथं नेमकं काय घडलं? ही चेंगराचेंगरी का झाली? याचा अनुभव सांगितला आहे. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेला मंडपाचे गेट पाहूनच येथील व्यवस्थेकडं दुर्लक्ष करण्यात आलं होतं का? याची शंका निर्माण होते. आतमध्ये जाण्यासाठी तसंच बाहेर पडण्यासाठी अत्यंत लहान रस्ता बनवण्यात आला होता. उष्णता, आद्रता आणि गुदरमरल्याचं वातावरण हे चेंगराचेंगरीचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातं. बंद मंडपातील लोकांनी बाहेर येण्यास सुरुवात केली आणि चेंगराचेंगरी सुरु झाली. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महिलांनी सांगितलं काय घडलं...


सत्संगाला आलेल्या एका महिलेनं सांगितलं, 'आम्ही एका वाहनामध्ये अनेक जणांसह या कार्यक्रमासाठी आलो होतो. एकूण किती जण होते हे मला माहिती नाही. पण, आमच्याबरोबर खूप लोकं होती हे मी सांगू शकते. सर्व जण एकमेकांना धक्का देत होते. एकमेकांवर चढले होते. त्यामध्ये अनेक जण दबले. सत्संग संपल्यानंतर आम्ही जात होतो त्याचवेळी दुसरी लोकं एकमेकांना धक्का देऊ लागली. एकमेकांना तुडवू लागली. 

या कार्यक्रमाला आलेल्या ज्योती या तरुणीनं तेथील परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. 'आम्ही अनेकजणांसह सत्संगासाठी इथं आलो होतो. इथं खूप लोकं होती. सुरुवातीला सर्व सुरळीत सुरु होतं. पण, सत्संग संपल्यानंतर सर्वजण एकमेकांच्या अंगावर चढले. हे सर्व कसं झालं हे समजलं नाही. आम्हाला बाहेर पडायला जागा सापडत नव्हती. सत्संगामध्ये बरेच लोकं सहभागी झाले होते. त्यामधील अनेकांचा मृत्यू झाला आहे. 

नक्की वाचा :  कोण आहेत संत भोले बाबा? ज्यांच्या सत्संगमध्ये झाली चेंगराचेंगरी
 

मृतदेहांचा ढीग

सत्संगाला आलेल्या लोकांनी हॉस्पिटलमधील व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केलीय. हॉस्पिटल परिसरात मृतदेहांचा ढीग पडलाय, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतरही एकही डॉक्टर कोणताही उपचार करायला तयार नाही. हॉस्पिटलमध्ये फक्त एकच डॉक्टर आहे. पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा सर्व प्रकार घडल्याचा संताप लोकांनी व्यक्त केलाय. काल रात्रीपासून रस्ता जाम होता. पोलिसांनी तो जाम दूर केला. त्यानंतर ही दुर्घटना घडली, असा दावा त्यांनी केलाय. 

Advertisement

लोकांनी सांगितलं की, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनही नाही. या परिस्थितीमध्ये कुणावर कसा उपचार होईल. पोलिसांपासून हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी निष्काळजीपणा करत आहेत. आमचं कुणीही ऐकायला तयार नाही. 

पोलिसांनी काय सांगितलं?

वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश कुमार सिंह यांनी माध्यांशी बोलताना या दुर्घटनेची माहिती दिली. 'सिकंदराराऊजवळ हाथरसमधील एका गावात सत्संग सुरु होता. त्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यानं अनेकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथं भोलाबाला यांचा सत्संग सुरु होता. त्या सत्संगासाठी अनेक जण आली होती. तिथं चेंगराचेंगरी झाल्यानं ही दुर्घटना घडली, अशी माहिती मिळाली आहे.