'अधिक मुलं जन्माला घाला', 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांचं आवाहन, सवलती देण्याचंही आश्वासन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी अधिक मुलं जन्माला घाला, असं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या या आवाहनाला दक्षिण भारतामधील राज्य विशेषत: आंध्र प्रदेशमधील घटत्या लोकसंख्येचा संदर्भ आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

लोकसंख्यावाढ आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण ही देशापुढील एक गंभीर समस्या आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारतानं यापूर्वीच चीनला मागं टाकून पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर कार्यक्रमही राबवले जातात. त्याचवेळी सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही दलाचे (NDA) प्रमुख नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी अधिक मुलं जन्माला घाला, असं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले चंद्राबाबू?

आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्राबाबू यांनी राज्यातील नागरिकांना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केलं. 'अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या कुटुंबांना सवलती देण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे दाम्पत्यांना अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन मिळेल,' असं नायडू यांनी सांगितलं. 

दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या व्यक्तींनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याबाबतचं विधेयक सादर करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचंही नायडू यांनी यावेळी सांगितलं.

दोनपेक्षा जास्त मुलं असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा पूर्वीचा कायदा आम्ही रद्द केला आहे. आम्ही आता दोनपेक्षा जास्त मुलं असलेल्या लोकांनाच ही निवडणूक लढवण्याबाबतचा कायदा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, एका हातामध्ये तलवारीच्या जागी संविधान )

का केलं आवाहन?

चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या या आवाहनाला दक्षिण भारतामधील राज्य विशेषत: आंध्र प्रदेशमधील घटत्या लोकसंख्येचा संदर्भ आहे. अनेक खेडेगावातील तरुण रोजगारासाठी देशातील अन्य भागात स्थालांतरित झाले आहेत. त्यामुळे गावात फक्त वृद्ध व्यक्तीच राहात असल्याचं नायडू यांनी सांगितलं. 

देशाच्या सरासरी लोकसंख्येचं प्रमाण 1950 च्या दशकात 6.2 होतं. ते 2021 साली 2.1 झालं आहे. आंध्र प्रदेशाततर हे प्रमाण 1.6 टक्के इतकं घटलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आपण सध्याच पिछाडीवर पडलो आहोत. दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास लोकसंख्या स्थिर राहू शकेल, असा दावा त्यांनी केला. 

भारत हा 2047 पर्यंतच तरुणांचा देश असेल. त्यानंतर आंध्र प्रदेशात तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या अधिक असेल, असा नायडू यांनी केला. राज्यातील जनतेचं सरासरी वय सध्या 32 आहे. ते 2047 साली 40 होईल, असं त्यांनी सांगितलं.

चीन जपानचं उदाहरण

चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी बोलताना चीन जपान या आशियाई देशांसह युरोपीयन देशांचं उदाहरण दिलं. या देशांमध्ये लोकसंख्य़ा वाढीला प्रोत्साहन दिलं जात आहे. लोकसंख्या वाढ ही समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.