Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर भागातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तब्बल 11 वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या माळीणमध्येही अशीच घटना घडली होती. हिमाचलमधील मंडीमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. मंडीतील गावकऱ्यांना आजही ती भयाण रात्री आठवली तरी धडकी भरते. रात्री 12 ते 1 दरम्यान अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. गावातील एक कुत्र्यामुळे या 67 जणांचे प्राण बचावले. कुत्रा जर भुंकला नसता तर कोणीच वाचू शकलं नसतं. केवळ या कुत्र्यामुळे गाव वाचलं आहे, अन्यथा येथेही पुण्यातील माळीणसारखी दुर्घटना घडली असती आणि अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं असतं.
सध्या येथील गावकऱ्यांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. गावातील निवासी नरेंद्र म्हणाले, 30 जूनची ती रात्र मी विसरू शकत नाही. सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र रात्री 12 वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेला कुत्रा अचानक भुंकू लागला आणि त्यानंतर रडू लागला. नरेंद्रने पुढे सांगितलं, कुत्रा सतत रडत होता. त्यामुळे आम्ही झोपेतून जागे झालो. जेव्हा मी कुत्र्याच्या जवळ गेले तेव्हा पाहिलं की, घराला एक मोठी भेग पडली होती. पाणी अत्यंत वेगाने घरात शिरत होते. मी कुत्र्याला घेऊन खाली गेलो आणि कुटुंबातील सर्वांना जागं केलं.
यानंतर गावातील इतर लोकांनाही जागं केलं आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यांनी वरच्या बाजूला असलेल्या त्रियंबला गावातील लोकांना फोन केला आणि या आपत्तीची माहिती दिली. पाऊस धो धो बरसत होता. सियाठी गावातील पुरुष आणि महिला चप्पल न घालताच पळत सुटले. यानंतर काही वेळात डोंगराचा मोठा भाग गावावर कोसळला. कित्येक घरं त्याखाली दबली गेली. आता गावात केवळ चार ते पाच घरं दिसत आहेत. बाकी सर्व ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय.
नक्की वाचा - Navi Mumbai : 'अटल सेतू'वरून डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांकडून शोध सुरू
नैना देवी मंदिरात घेतला आश्रय...
गेल्या सात दिवसांपासून त्र्यंबला गावात बांधलेल्या नैना देवी मंदिरात गावकऱ्यांनी आश्रय घेतला आहे. गावात उपस्थित असलेल्या हिमाचल आरोग्य विभागाच्या पथकाने सांगितले की या लोकांमध्ये वृद्ध लोक, महिला आणि मुले आहेत. यातील अनेकांना बीपी आणि डिप्रेशनचा सामना करावा लागत असल्याचं दिसतंय.