RSS Vijayadashami : कोणाचीही गुंडगिरी चालू देऊ नका ! सरसंघचालकांच्या भाषणातील 15 ठळक मुद्दे

सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील तोडगे काय याबाबत उहापोह केला.

जाहिरात
Read Time: 6 mins
नागपूर:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा (RSS Vijayadashami)  नागपुरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भारताला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील तोडगे काय याबाबत उहापोह केला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहूयात. 

  1. हे महत्त्वाचे वर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती आहे. उत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या. शीलसंपन्नतेचा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला. विपरीत परिस्थिती राज्य चालवले, धोरणे आखली, स्वत:च्या राज्यासोबतच देशभरात धर्मसंस्कृतीच्या वाढीसाठी ठिकठिकाणी मंदिरे बांधले, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या. धर्मसंरक्षणात निस्पृह भावनेतून त्यांनी काम केले. त्यांचे आज आपण स्मरण करत आहोत. 
  2. प्रगत सुखी मानव समाजात स्वार्थ आणि अंहकारामुळे निरनिराळे संघर्ष सुरू झाले. इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध आणकी किती भडकेल आणि त्याची व्याप्ती किती असेल, जगावर यामुळे  कोणते संकट येईल  याची चिंता सगळ्यांना आहे. भारत पुढे जातोय, तंत्रज्ञान, शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जातोय. सर्व क्षेत्रात भारत पुढे जातोय. समाजही हळहूळू समजूतदार होत आहे. यामुळे जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका शांततेत पार पडल्या. जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. योग हा जगभरात फॅशन बनत चालला आहे. त्यामागचे शास्त्र आणि परिणामही जग स्वीकारू लागले आहे.  
  3. वाटेत काटे आहेत, जगभरात समस्या निर्माण होत आहे जी आपल्याला समजणे गरजेचे आहे. या समस्येचे मायावी रूप आहे. भारत पुढे जाऊ नये यासाठी विविध खेळ्या रचल्या जात आहेत. भारत आजही सगळ्यांना मदत करतो.  गरज पडल्यास भारत शत्रूलाही मदत करतो. शांतता नांदावी यासाठी आपल्या हितांचे बलिदानही आपण केले आहे. अशी वृत्ती जगामध्ये नाही. यामुळेच भारत पुढे जात आहे. 
  4. बांग्लादेशात मोठा उत्पात झाला. तिथल्या उत्पातामुळे तिथल्या हिंदू समाजावर वारंवार अत्याचार करण्यात होत आले आहेत, तीच परंपरा चालू राहिली. तिथला हिंदू समाज आपल्या बचावासाठी रस्त्यावर  उतरला यामुळे  काही प्रमाणात बचाव झाला.  काहीही गडबड झाली की दुर्बळांवर आपला राग काढण्याची कट्टरपंथीयांची प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हिंदूच नाही तर बांग्लादेशातील सगळ्या अल्पसंख्यांकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. हिंदूंना जगभरातील मदतीची आवश्यकता आहे. भारत सरकार मदत करेल अशी त्यांची अपेक्षा आहे. दुर्बळ राहणे हा गुन्हा आहे हे हिंदूंच्या लक्षात आले पाहिजे. दुर्बळ, असंघटीत असाल तर अत्याचाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे जिथे असाल तिथे संघटीत राहणे, सशक्त राहणे गरजेचे आहे. कोणासोबत शत्रूता करू नये, हिंसक बनू नये, योगदान देणे बनावे मात्र त्याचा अर्थ दुर्बळ होणे किंवा अशक्त राहाणे होत नाही. हे आपल्याला करावेच लागेल. 
  5. बांग्लादेशात अशी चर्चा असते की भारतापासून आपल्याला धोका आहे, त्यामुळे पाकिस्तानची आपल्याला साथ घेतली पाहिजे तोच आपला प्रामाणिक मित्र आहे. आपल्यादोघांकडे आण्विक अस्त्रे आहेत त्याने भारताला आपण रोखू शकतो. ज्या बांग्लादेशाची निर्मितीमध्ये भारताने योगदान दिले, कोणताही वैरभाव ठेवला नाही त्या बांग्लादेशात ही चर्चा सुरू आहे. ही चर्चा कोण घडवत आणत आहे ?  ही कोणत्या देशांच्या हिताची बाब आहे ? आपल्या देशातही असे व्हावे ही इच्छा आहे, कारण भारत मोठा झाला तर स्वार्थी लोकांची दुकाने बंद होतील. 
  6. डीपस्टेट, वोकिझम, कल्चरल मार्किझम असे शब्द चर्चेत आहेत. भारतातही हे चर्चेत आहेत. पर्यायी राजकारणाच्या आडून काही गोष्टी सुरू आहेत. सीमाभागात कारस्थाने रचली जात आहेत. आपल्याला वेळेवर जागृत व्हावे लागेल. 
  7. भारतात कुप्रभाव निर्णाय केला जात आहे. लहान मोठ्या लोकांच्या हातात मोबाईल आहेत. मोबाईलवर काय दाखवले जावे यावर नियंत्रण राहिलेले नाही. घरात,कुटुंबात नियंत्रण राखणे आणि विधीव्यवस्थेतून यार नियंत्रण आणण्यासाठी कायदा बनणे गरजेचे आहे.  संस्कार भ्रष्टतेचे अनेक कुपरिणाम होतात. विवक न राहिल्याने नवी पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. काही ठिकाणी असं वातावरण बनलंय की जे अंमली पदार्थ गेत नाही त्यांना मागास मानले जातात. 
  8. द्रौपदीच्या वस्त्रालाहात घातला तर महाभारत झाले, सीतेचे अपहरण झाले तर रामायण घडले. आणि इथे काय घडतंय ? कोलकात्यामध्ये आरजी कर हॉस्पीटलमध्ये घडलेली घटना ही लज्जास्पद आहे, सगळ्यांना कलंकित करणारी घटना आहे. हीच एकच घटना नाही. तिथला समाज डॉक्टरांसोबत उभे राहिले.अशा घटना होऊच नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.  सुरक्षा देणे गरजेचे आहे. घटना घडल्यानंतर आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला .  गुन्हे आणि राजकारणाची युती झाली त्याचा हा परिणाम आहे. परस्त्री मातेसमान आहे असं मानतो. माध्यमांवर जे दाखवलं जातं त्यातून समाज जाणतेपणी किंवा अजाणतेपणी गोष्टी स्वीकारत असतो. त्यावर  काय दाखवलं जातंय याचे भान राखणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही, मूल्ये पायदळी तुडवली गेली तर ते महागात पडेल. म्हणूनच यासाठीची व्यवस्था करावी लागेल. 
  9. ट्रॅफीक जाम झाले तर ते देखील असंतोषाचे कारण बनतो. विरोधाचे अनेक मार्ग आहेत. ते धुडकावत कायदे पायदळीत तुडवत जो उपद्रव केला जातो त्याला असंतोष म्हणण्याऐवजी गुंडगिरी म्हणणे योग्य ठरते. बाबासाहेब आंबेडकरांनी याचबद्दल आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामर ऑफ अनार्की ( अराजकतेचे व्याकरण) मध्ये त्यांनी हे सांगितले होते. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांवर दगडफेक झाली , का झाली ? अशा गोष्टींवर नियंत्रण आणणे हे प्रशासनाचे काम आहे. काही ठिकाणी होते, काही ठिकाणी थोडी ढिलाई दाखवली जाते. प्रशासन येईपर्यंत समाजाला भोगावे लागते, म्हणून समाजाने सावध राहणे, तयार राहणे गरजेचे आहे. गुंडगिरी  चालू देऊ नका. कोणाचीही गुंडगिरी अक्षम्य आहे. आपले आणि आपल्या लोकांचे प्राण, मालमत्तेचे रक्षण करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. पोलीस प्रशासन येईपर्यंत रक्षण करणे हा आपला अधिकार आहे. मी हे कोणाला घाबरवण्यासाठी म्हणून सांगत नाहीये.  
  10. समाजाला सशक्त, संघटीत राहणे गरजेचे आहे. दुर्बळांची पर्वा देवही करत नाहीत. सद्भावना आणि समरतेशिवाय संघटन शक्य नाही. आपण आपल्या संतांना, देवांना वाटून घेतले आहे. वाल्मिकी जयंती वाल्मिकी वस्तीतच का साजरी होते ? वाल्मिकींनी रामायण संपूर्ण हिंदू समाजासाठी लिहिले होते. भगवान वाल्मिकींची , भगवान रोहिदासांची जयंती सगळ्यांनी मिळून साजरी केली पाहिजे. सगळे सणवार संपूर्ण हिंदू समाजाने साजरे करायला हवेत.    मंदिरे, पाणी आणि स्मशाने हे सगळ्यांसाठी खुले असावेत असे वातावरण निर्माण व्हायला हवे. 
  11. जातीवर्गाच्या प्रमुख लोकांनी ब्लॉक स्तरापर्यंत एकत्र आले आणि आपल्या जातीच्या भल्यासाठी वेळेनुसार बदल करत सुखी समृद्ध कसा होऊ शकतो याची चर्चा होणे गरजेचे आहे. आपापल्या जातींच्याबद्दल चर्चा करतो हे ठीक आहे मात्र संपूर्ण समाजासाठीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दुर्बळ जातींच्या भल्यासाठी काय करायला हवे याबाबतही चर्चा करणे गरजेचे आहे. 
  12. सिंगल यूज प्लॅस्टीक आपल्या इथे वापरू दिले जाऊ नये, झाडे लावा. घरात थोडाफार भाजीपाला पिकवा,  हिरवळ वाढवा. अनेक झाडं आपण फॅशन म्हणून लावली. या झाडांवर पक्षी बसत नाही,  अशा झाडाच्या सान्निध्यात येणाऱ्यांना विकार होतात. अशी झाडे लावू नका. 
  13.  ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्या सांगूही शकणार नाही इतकं बिभीत्स असतात. यामुळे त्यावर कायद्याने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. संस्कार भ्रष्टतेचे ते मोठे कारण आहे. 
  14. संविधान हे आपला देश कसा चालावा याचा नियम आहे. त्यामुळे त्याबाबतचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.  प्रस्तावना, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार असे संविधानाचे भाग आहे. सामान्य लोकांनाही याची माहिती असणे गरजेचे आहे. 
  15. उपद्रव कोणी एकाने केला त्यासाठी सगळ्या वर्गाला दोषी ठरवले चुकीचे आहे. सहिष्णूता, सद्भावना भारताची परंपरा आहे. असहिष्णूता, दुर्भावना भारत आणि मानवविरोधी दुर्गुण आहे. भारताची शक्ती वाढल्याने मान वाढला आहे, भारतीय नागरिकांची प्रतिष्ठाही वाढली आहे. भारत देश जेवढा मोठा होईल तितक्या त्याच्या भूमिका मान्य केल्या जातील.  

Topics mentioned in this article