अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं एक चित्र निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर त्यांनी तसंही ट्वीटही केलं होतं. यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक दावे-प्रतिवादे केले जात आहे. विरोधकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारावर आक्षेप नोंदवला जात आहे. काल 11 मे रोजी संजय राऊत यांनीही यावर निराशा व्यक्त केली होती. आता रोहित पवार यांनीही अमेरिकेला कडक संदेश देण्याची गरज व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावर रोहित पवार म्हणाले, शस्त्रसंधी झाली, पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्वीट आधी आलं. त्यामुळे या सगळ्यावर बाहेरचा प्रभाव असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तीन तासातच पाकिस्तानने शस्त्रसंधीच उल्लंघन केलं. त्यामुळे देश म्हणून या गोष्टी आम्हाला पटत नाहीत. इंदिरा गांधींच्या काळातही त्यावेळी अमेरिकेने दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इंदिरा गांधी झुकल्या नाहीत. पाकिस्तानमध्ये शिरून त्यांना गुडघ्यावर आणण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं होतं. पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. असं आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.
आताही संधी आहे. बलुचिस्तानसारखा विषय आहे. तिथून पाकिस्तानला विरोध होतोय. पाकिस्तान जर गद्दारी करणार असेल, शब्द देऊन सुद्धा ते पाळणार नसतील, तर पाकिस्तानला एक कडक संदेश देण्याची गरज आहे आणि आमचा लष्करावर विश्वास आहे. अशा काळामध्ये कोणतंही सरकार असलं, विरोधी पक्षातले असो किंवा सत्तेतले सगळ्यांनी एकत्रितपणे राहण्याची गरज आहे. आम्ही सुद्धा बरोबर आहोत, असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी कोकणातील दापोली दौऱ्यादरम्यान व्यक्त केला. यावेळी रोहित पवारांनी माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचं कौतुक केलं. तत्कालीन संरक्षण मंत्री असताना कैलासवासी मनोहर पर्रीकर यांनी घेतलेली एस ४०० ही यंत्रणा खूप महत्त्वाची ठरली अशा शब्दांत रोहित पवार यांनी कौतुक केलं.
नक्की वाचा - India Pakistan Tension: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी, मोदी निर्णय घेणार?
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी अन् अमेरिकेच्या एन्ट्रीमुळे इंदिरा गांधी का आठवल्या, काय आहे तो किस्सा?
सध्याच्या घटनांमुळे अनेकांना इंदिरा गांधींची आठवण येत आहे. इंदिरा गांधींनी अमेरिकेचे राष्ट्रपतींची प्रत्येक गोष्ट नाकारली आणि पाकिस्तानशी मोठी लढाई केली ज्यात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि जगाचा नकाशाच बदलला. 1971 साली आताचा बांग्लादेश म्हणजेच पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने दहशत पसरवली होती. तेथून लोक पळ काढत भारताला शरण येत होते. यावेळी नोव्हेंबर 1971 मध्ये इंदिरा गांधी अमेरिकेत पोहोचल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ज निक्सन यांच्याशी बोलण्यासाठी इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या होत्या. अमेरिकेत बोलणं झालं तर संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होईल. मात्र निक्सन यांना इंदिरा गांधी फारशा आवडत नव्हता. त्यामुळे निक्सन यांनी इंदिरा गांधी यांना तब्बल 45 मिनिटं प्रतीक्षा करायला लावली आणि जेव्हा भेट झाली तेव्हा पूर्व पाकिस्तानबद्दल काहीच बोलणं झालं नाही.
इंदिरा गांधी भारतात परतल्या. त्यानंतर पाकिस्तानसोबत युद्ध झालं. यु्द्ध संपलं त्यावेळी बांग्लादेश नवा देश झाला होता आणि पाकिस्तानचे 91 हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. या युद्धादरम्यान अमेरिका पाकिस्तानसोबत होता, मात्र इंदिरा गांधींनी अमेरिकेकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यावेळी रशिया भारतासोबत होता.