भारत आणि पाकिस्तान तणावामुळे देशभरातील 32 हून अधिक विमानतळांवरील उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. 15 तारखेपर्यंत ही उड्डाणं बंद राहतील असं भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान या निर्णयात बदल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर 9 राज्यांमधील 32 विमानतळं तत्काळ उघडण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रेस नोट जारी करीत याबाबत माहिती दिली. 9 मे ते 15 मे या कालावधीत देशातील 32 विमानतळं बंद ठेवण्यात आली होती. मात्र शस्त्रसंधी झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला असून आज 12 मेपासून विमानतळं सेवा सुरू करण्यात आली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण प्रेस नोटमध्ये दिल्यानुसार, नागरी विमानांच्या उड्डाणासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली 32 विमानतळ तत्काळ प्रभावाने पुन्हा खुली करण्यात आली आहेत. प्रवास करत असलेल्या सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपली विमानाची उड्डाण स्थिती संबंधित एअरलाईनकडून थेट तपासणी करून घ्यावी आणि एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित अपडेट पाहत राहावीत.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 110 दहशतवादी ठार...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हातात घेतलं होतं. या ऑपरेशनमध्ये पाकिस्ताला जोरदार दणाक दिल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. भारताने केलेल्या हल्ल्यात जवळपास 110 दहशतवादी ठार झाले. भारताने जवळपास 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने भारतीय नागरिकांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे एअर बेस उद्धवस्त केले अशी माहिती सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत, लष्कराचे लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजीएमओ, नौदलाचे व्हाईस एडमिरल ए.एन. प्रमोद, डीजी, नेव्हल ऑपरेशन्स आणि हवाई दलाचे एअर मार्शल ए.के. भारती, डीजी, एअर ऑपरेशन्स सहभागी झाले होते.