MEA on Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील भारताच्या धोरणात्मक भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत आज (मंगळवार, 13 मे) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणत्याही समस्यांवर भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पातळीवर तोडगा काढला पाहिजे, अशी आमची दीर्घकाळची राष्ट्रीय भूमिका आहे. ती धोरणात्मक भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय प्रदेशावरील ताबा सोडणे हा प्रलंबित मुद्दा आहे, पाकिस्ताननं तो ताबा सोडावा, असं जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानं गोळीबार थांबवला तर आम्हीही गोळीबार थांबवू, असंही पराराष्ट्र मंत्रालयाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सिंधू जलकरार स्थगितच
रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबवेपर्यंत भारताकडून सिंधू जल करार स्थगित ठेवण्यात येईल. 'सिंधू जल करार चांगुलपणा आणि मैत्रीच्या भावनेतून करण्यात आला होता, जे कराराच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद आहे. त्यानंतरही, पाकिस्तानने दशकानुदशके सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देऊन या तत्त्वांना तिलांजली दिली आहे."
पाकिस्ताननं भारतीय ठिकाणांवर हल्ला केल्याचा खोटा प्रचार केला. पराभवानंतरही ढोल वाजवणे, ही पाकिस्तानची जुनीच रणनिती आहे. त्यांनी कारगील युद्धाच्या वेळी देखील हे केले होते, याची आठवण जयस्वाल यांनी यावेळी करुन दिली. 10 मे रोजी पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्ताननं गुडघे टेकले. पाकिस्ताननं त्यांच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती नाकारली आहे. TRF या दहशतवादी संघटनेबाबतचे पुरावे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात झालेल्या नाचक्कीची पाकिस्तानकडून पहिल्यांदा कबुली, 11 सैनिक ठार तर.... )
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे
- पाकिस्तान भारतामधील दहशतवाद्यांना पाठिंबा देत असेल तोपर्यंत त्यांना सिंधू करारातील पाणी मिळणार नाही
- पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली होती.
- एअरबेस उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानचे सूर बदलले.
- दहशतवादी संघटना टीआरएफबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) आणखी पुरावे देणार.
- पाकिस्तानने भारताच्या ठिकाणांवर हल्ल्यांबाबत खोटे पसरवले.
- 10 मे रोजी एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला.
- पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (POK) रिकामा करावा.
- पाकिस्तानने सैन्य कारवाई थांबवली आहे.
- भारताने 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
- हारूनही ढोल बडवण्याची पाकिस्तानची जुनी सवय आहे.
- पाकिस्तान हरल्यानंतरही विजयोत्सव साजरा करण्याचा देखावा करतो.