जपान सरकारने चालू हंगामात भारतातून आयात केल्या जाणाऱ्या ताज्या आंब्यांवर थेट बंदी लागू केली आहे. जपानच्या कडक जैवसुरक्षा नियमांनुसार भारतीय आंबा प्रक्रिया केंद्रांमध्ये त्रुटी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जपानने जवळपास दोन दशकानंतर भारतीय आंब्यांवर अशा प्रकारची बंदी घातली आहे. यापूर्वी फ्रुटफ्लाय प्रादुर्भावामुळे जपानने भारतीय आंब्यांवर बंदी घातली होती, जी भारताने प्रक्रिया कडक केल्यानंतर 2006 मध्ये उठवण्यात आली होती.
या निर्णयामुळे एप्रिल ते जून या आंबा निर्यातीच्या मुख्य उन्हाळी हंगामात जपानच्या बाजारपेठेतून भारतीय आंबे गायब राहणार आहेत. भारताचा जगप्रसिद्ध हापूस (Alphonso), गुजरातचा केशर (Kesar), उत्तर भारतातील लंगडा आणि दक्षिणेतील बनगनपल्ली यांसारख्या प्रीमियम आंब्यांच्या निर्यातीला यामुळे मोठा ब्रेक लागला आहे. जपान आपल्या देशातील शेतीचे परदेशी कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत कडक 'झिरो-टोलरन्स' धोरण राबवतो.
(नक्की वाचा- Pune Shocking News: पिंपरीपाठोपाठ पुण्यातही थैमान! पुण्यात 5 मृत्यूंसह आकडा 16 वर; विषारी दारुचा संशय)
नेमके काय आहे बंदीचे कारण?
आंब्यांची जपानला निर्यात करण्यापूर्वी त्यांना 'व्हेपर हीट ट्रीटमेंट' (VHT) प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेत कोणत्याही केमिकलचा वापर न करता, नियंत्रित उष्ण आणि दमट हवेच्या सहाय्याने आंब्यामधील कीटक आणि फळमाशीच्या अळ्या नष्ट केल्या जातात. दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
तपासणीत धक्कादायक बाबी समोर
मार्च 2026 मध्ये जपानच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने उत्तर प्रदेशातील रेहमानपूर येथील 'VHT' सुविधेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या तपासणीदरम्यान कीड-नियंत्रण आणि धुरीकरण प्रक्रियेत गंभीर तांत्रिक व व्यवस्थापकीय त्रुटी आढळून आल्या. दोन्ही देशांनी अद्याप तांत्रिक त्रुटींची नेमकी माहिती सार्वजनिक केलेली नाही, परंतु या तपासणीनंतर योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने स्पष्ट केले की, 25 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर जारी करण्यात आलेली भारतीय तपासणी प्रमाणपत्रे जपान स्वीकारणार नाही.
(नक्की वाचा- Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण)
आंबा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार संकटात
भारत हा दरवर्षी जवळपास 28 मिलियन मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. उत्पादित होणारा बहुतांश आंबा देशांतर्गत बाजारातच विकला जातो. परंतु जपानसारख्या उच्च दर्जाच्या बाजारपेठेत मिळणाऱ्या प्रीमियम किमतींमुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. जपान हा भारताचा सर्वात मोठा आंबा बाजार नसला, तरी तिथे मिळणाऱ्या उच्च दरांमुळे या निलंबनाचा मोठा आर्थिक फटका आंबा व्यापाराला बसणार आहे.