पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी हवाई दलाच्या आदमपूर तळावर पोहोचले होते. त्यांनी दिलेल्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. सैनिकांशी पंतप्रधान मोदींनी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि Operation Sindoor मध्ये तीनही दलाच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल पुन्हा एकदा कौतुक केलं. सोमवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या निवेदनामध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबविल्याबद्दल तीनही दलाचे जवान, हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत आणि सुरक्षित करणारे शास्त्रज्ञ यांचे कौतुक केले होते आणि त्यांना सॅल्यूटही केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे थेट जवानांच्या भेटीला पोहोचले असून या भेटीचे फोटो व्हायरल होताच पाकिस्तानमध्ये अस्वस्थता अजून वाढली आहे. याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने सातत्याने भारताविरोधात खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने अफवा पसरवली होती की भारताच्या आदमपूर येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्यात आलेला आहे. खोटं बोलण्याची सवय लागलेल्या पाकिस्तानने केलेले दावे किती खोटे आहेत हे दाखवण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी मैदानात उतरल्याचे या आजच्या भेटीवरून दिसून येत आहे.
नक्की वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
पहलगाम इथे सुट्टीमध्ये फिरायला आलेल्या निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला चढवत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यात किमान 100 दहशतवादी ठार मारण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळांवरही भारताने हल्ला चढवला होता, ज्यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने ड्रोन, मिसाईलच्या माध्यमातून भारतावर हल्ला केला होता. हे सगळे हल्ले भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने परतवून लावले आहेत.
नक्की वाचा : आता काश्मीरबाबत नाही तर पाकव्याप्त काश्मीरबद्दल चर्चा करू! PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
ऑपरेशन सिंदूर हे स्थगित करण्यात आले असून ते संपलेले नाही असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मंगळवारी त्यांनी हवाई दलाच्या आदमपूर तळावरील जवानांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी ही भेट दिल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधानांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलंय की, मी आज सकाळी AFS आदमपूरला भेट दिली आणि भारताच्या शूरवीर जवानांची भेट घेतली. हे जवान दृढ निश्चय, निरडरपणा आणि साहसाचे मूर्तीमंत प्रतीक आहेत. अशा या जवानांना भेटणे हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. आपल्या देशासाठी सशस्त्र दलांनी जे काही केलं आहे त्या सर्व गोष्टींबाबत भारत देश त्यांचा सदैवी ऋणी राहील