अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अपघातग्रस्त झालं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उड्डाण झाल्यानंतर काही सेकंदात ते कोसळलं. प्रवशांना काही समजण्याच्या आतच हा अपघात झाला. 242 प्रवाशी या विमानात होतं. कुणी आपल्या घरी जात होतं, तर कुणी आपल्या कुटुंबीयाना भेटण्यासाठी जात होतं. तर कुणी सुट्टी संपवून आपल्या मायदेशी जात होतं. त्यात असं एक वृद्ध जोडपं होतं जे आपल्या लाडक्या लेकाला भेटण्यासाठी जात होतं. पण त्यांची ती इच्छा अपूर्णच राहीली. हे जोडपं पंढरपूरच्या सांगोल्याचं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महादेव पवार वय वर्ष 67. आशा पवार वय वर्ष 55. हे वृद्ध दाम्पत्य मुळचं पंढपूरच्या सांगोल्याचे रहिवाशी आहेत. त्यांचा एक मुलगा लंडनला असतो. तर दुसरा मुलगा हा अहमदाबादला असतो. दोघांचेही व्यवसाय आहेत. लंडनला जो मुलगा आहे त्याचा बेकरीचा बिझनेस आहे. त्याला भेटण्यासाठी पवार दाम्पत्य जाणार होतं. त्यांनी विमान अहमदाबाद वरून पकडण्याचा निर्णय घेतला होता.
कारण त्यांचा दुसरा मुलगा हा अहमदाबादला राहातो. त्यामुळेच त्यांनी अहमदाबादवरून जाण्याचा निर्णय घेतला. लाडक्या लेकाला भेटण्याची उत्सुकता त्यांना होती. त्यामुळे ते वेळेत विमानतळावर पोहोचले. पुढच्या पाच तासात आपण लंडनमध्ये असून, लाडक्या लेकाला भेटी ही स्वप्न ते दोघे ही पाहात होते. घरच्यांचा निरोप घेवून ते निघाले. लंडनमध्ये असलेल्या मुलाला ही आपण निघालो असल्याचं कळवलं.
ठरल्या वेळे प्रमाणे विमानात ही ते बसले. पण पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नसेल. त्यांच्या मनात लंडन आणि आपला मुलगा हेच घोळत होतं. विमान वेळेत सुटलं. पण वेळेत ते पोहचू शकलं नाही. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात हे विमान कोसळलं. आगीचे लोळ आकाशात उटले. क्षणात सर्व काही संपलं. कुणाला वाचवण्याची संधी ही मिळाली नाही. या अपघातात पवार दाम्पत्याचेही निधन झाले. ते सांगोला तालुक्यातील हातिद गावचे होते.