
एअर इंडियाच्या B787-B या विमानाचा अपघात झाला. त्यानंतर एकच हाहाकार माजला. जवळपास 242 प्रवाशी या विमानात होते. हा अपघात इतका भयंकर होता की विमान कोसळण्यानंतर बराच वेळ आग लागली होती. धुराचे लोळ लांबपर्यंत दिसत होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. बचाव कार्य त्यात सुरू होते. हे विमान डॉक्टरांच्या होस्टेलवर कोसळले. हा अपघात नेमका कसा झाला यावर आपण एक लक्ष टाकणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे विमान अहमदाबादवरून लंडन जाणार होतं. या विमानाची क्षमता 247 होती. विमान टेक ऑफच्या वेळी विमानात 242 प्रवासी होते. त्यात 169 भारतीय , 53 ब्रिटीश, 1 कॅनेडियन 9 पोर्तुगीज प्रवासी होते. विशेष म्हणजे प्रवाशांमध्ये 11 लहान मुलं होती. विमानाने 1 वाजून 38 मिनिटांनी टेक ऑफ केलं. टेक ऑफ नंतर अवघ्या 1 मिनिटात त्याचा संपर्क तुटला. पुढील पाच ते दहा मिनिटात विमान बघता बघता कोसळलं.
ज्यावेळी विमान जमीनीपासून 625 फूटांवर होतं त्याच वेळी त्याचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी वैमानिकानं मे डे कॉल दिला. हा कॉल ज्यावेळी विमान अतिशय संकटात असते त्यावेळी दिला जातो. पण त्यानंतर पुढे काही संपर्क होवू शकला नाही. कारण काही क्षणात विमान कोसळले होते. हे विमान बोईंग कंपनीनं बनवलेलं 787 ड्रिमलायनर आहे. 186 फूट लांबीचं हे विमान आहे. त्यात 248 प्रवासी क्षमता आहे. तर जवळपास 227 टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. या विमानाची किंमत तब्बल 382 कोटी रुपये आहे. शिवाय इंधनाच्या बाबतीत 20% किफायतशीर म्हणून त्याची ख्याती आहे.
विमान अपघात झाल्यानंतर एकच धावपळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने अमित शाह यांनी अहमदाबादला रवाना होण्याच्या सुचना केल्या. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ही आंध्र प्रदेशातून तातडीने गुजरातला गेले. हे विमान सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय समजलं जातं. या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच ते कोसळले त्यामुळे सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहे. क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world