- छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे
- या चकमकीत आतापर्यंत बारा नक्षलवादी ठार झाले असून, त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले गेले आहेत
- सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत तर दोन जवान जखमी झाले आहेत.
मनीष रक्षमवार
Anti Naxal Encoounter: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. आज बुधवार सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत 15 नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. नक्षली कमांडर मंगूस यालाही ठार करण्यात आले आहे. दुर्दैवाने, सुरक्षा दलाचे (DRG) 3 जवान शहीद झाले आहे. तर 2 जवान जखमी झाले आहेत. चकमक अद्याप सुरू असून, सुरक्षा दल मोठ्या शौर्याने नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत. घनदाट जंगलात ही चकमक सुरू आहे.
बीजापूर आणि दंतेवाडा सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे गट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बीजापूर पोलिसांचे DRG, STF आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्त अभियान सुरू केले. केशकुतुलच्या जंगलात या सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली. त्यानंतर चकमक सुरू झाली. सकाळपासून या भागात थांबून थांबून गोळीबार सुरू आहे. परिसरात जवानांकडून सखोल शोध मोहीम राबवली जात आहे.
मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाला घेरले आहे. जवान हा घेरा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. बस्तरचे आयजी (IG) सुंदरराज पी. यांनी या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संपूर्ण बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे, ज्याचा उद्देश मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा पूर्णपणे सफाया करणे आहे. चकमक पूर्ण झाल्यावर अंतिम माहिती जाहीर केली जाईल.
नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह, चकमकीच्या ठिकाणाहून 303 आणि 350 मिमी एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत डीआरजीचे 3 जवान, हेड कॉन्स्टेबल मोनू वड्डी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले आहेत. कॉन्स्टेबल सोमदेव यादव जखमी झाले आहेत. डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफ जवानांसोबत अजूनही चकमक सुरू आहे.