El Nino effect : देशात दरवर्षी जून महिना जवळ येताच भारतात एका गोष्टीकडे सर्वाधिक नजर ठेवली जाते. तो म्हणजे प्रशांत महासागरात तयार होणारा अल निनो. अल निनोचा स्पॅनिशमधील अर्थ लहानगा मुलगा असा आहे. या 'लहान मुलाने'च गेल्या काही दिवसांपासून जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यामुळे शेतकरी असो, हवामान तज्ज्ञ किंवा सरकार, सर्वजण अल निनोच्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत. कारण स्पष्ट आहे, भारतात शेती, जलस्त्रोत आणि कोटी लोकांचं आयुष्य मान्सूनवर अवलंबून असतं.
शेतकऱ्यांसाठी सर्वात चिंताजनक बातमी समोर
जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे देशातील वार्षिक पर्जन्यमानाचा मोठा भाग मिळतो. त्यामुळे, मान्सून कमकुवत झाल्यास त्याचे परिणाम शेतापासून ते बाजारांपर्यंत थेट जाणवतात. बऱ्याच काळापासून अल निनोला भारतीय मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो.
दरम्यान शेतकऱ्यांसाठी सर्वात चिंताजनक बातमी समोर आली आहे. विषुववृतीय प्रशांत महासागरात मे ते जुलैदरम्यान 'एल निनो' सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं आगमन होत असतानाच एल निनो सक्रीय होणार आहे. त्याचा थेट परिणाम यंदाच्या मान्सूनवर होऊ शकतो. पावसाचं प्रमाण घटण्याची दाट शक्यता असल्यानं त्याचा फटका शेतीला बसू शकतो. एल निनोमुळे मॉन्सूनचा पाऊस अनियमित बरसेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही भागात पाऊस दडी मारण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारण, शेततळी यावर भर देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.