भारताने दणका दिल्यानंतर आता पाकिस्तान नरमला आहे. भारताला नेहमीच युद्ध आणि अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना शांतीची आठवण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारतासोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.
शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की, पाकिस्तान शांततेसाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कामरा एअरबेसला भेट देताना त्यांनी हे वक्तव्य केले. भारतासोबत चर्चा आणि शांततेच्या अटींमध्ये काश्मीर मुद्द्याचा समावेश करण्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे. भारताने सुरुवातीपासूनच संपूर्ण जगाला हे स्पष्ट केले आहे की जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग होते, आहेत आणि राहतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शाहबाज शरीफ यांच्या लष्करी तळांना भेटी
भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाल्यानंतर चार दिवसांनी हे सर्व थांबलं. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली. संघर्ष संपवण्यासाठी करार झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांचा पाकिस्तानच्या लष्करी तळांनी भेटी दिल्या.
(नक्की वाचा- Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही)
यावेळी उपपंतप्रधान इशाक दार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू हे देखील एअरबेसवर उपस्थित होते. त्याआधी शाहबाज शरीफ यांनी बुधवारी सियालकोटमधील पसरूर छावणीला भेट दिली. जिथे त्यांनी पाकिस्तानी सैनिकांशी संवाद साधला.
ऑपरेशन सिंदूर, पहलगामचा बदला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भारताने 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आणि 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.
(नक्की वाचा :तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा महागात पडला; उदयपूरच्या मार्बल व्यापार्यांनी 5000 कोटींचे व्यवहार मोडले)
त्यानंतर पाकिस्तानने 8, 9आणि 10 मे रोजी अनेक भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. भारतीय सशस्त्र दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि रफीकी, मारिड, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियानसह अनेक पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले.