
राजस्थान: सोमवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या निवेदनामध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबविल्याबद्दल तीनही दलाचे जवान, हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत आणि सुरक्षित करणारे शास्त्रज्ञ यांचे कौतुक केले होते आणि त्यांना सॅल्यूटही केला होता. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या आदमपूर तळाला भेट दिली. यावेळी सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सैनिकांच्या शौर्याला सलाम केला. यावेळी त्यांनी अतिरेक्यांना आश्रय देणारे सरकार आणि अतिरेकी यांना वेगळे समजणार नाही, भारत आपल्या शर्थीवर शत्रूला उत्तर देणार, कुठलीही न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही. अशी त्रिसुत्रीही सांगितली.
नक्की वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
"भारत माता की जय फक्त घोषणा नाही ही त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो भारतमातेसाठी जिवाची बाजी लावतो. 'भारत माता की जय' मैदानात ही घुमतो आणि मोहिमेतही घुमते. भारताचे सैनिक भारत माता की जय म्हणतात तेव्हा शत्रुंचे काळीज चिरते. जेव्हा आपले ड्रोन, मिसाईल लक्ष्यांवर केंद्रीत होतात तेव्हा शत्रुंना भारत माता की जय ऐकू येते, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सैनिकांचे कौतुक केले.
तसेच "जेव्हा आपले सैन्य न्युक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवा काढतात तेव्हा आकाश ते पाताळ फक्त भारतमातेचाच जयघोष होतो. तुम्ही प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. तुम्ही नवा इतिहास रचला आहे. मी आज तुमचे दर्शन करायला आलो आहे. शूरविरांचे पाय जमिनीवर पडतात तेव्हा धरती धन्य होते. अशा विरांचे दर्शन मिळाले की आयुष्य धन्य होते. भारताच्या पराक्रमाची कायम चर्चा होईल त्यामधला सर्वात महत्वाचा अध्याय तुम्ही आणि तुमचे असतील. मी विरांच्या या धरतीवरुन एयरफोर्स, नेव्ही, सर्वांना सलाम करतो, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
नक्की वाचा : आता काश्मीरबाबत नाही तर पाकव्याप्त काश्मीरबद्दल चर्चा करू! PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
तसेच "जेव्हा आमच्या लेकींचे कुंकु पुसले गेले तेव्हा आम्हाला दहशतवाद्यांना चिरडून टाकावे लागले. तुम्ही दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले.9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना हे समजले आहे की भारताकडे डोळे उघडणाऱ्या प्रत्येकाचा एकच शेवट असेल, तो म्हणजे विनाश." असा इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला.
दरम्यान, "आज ऑपरेशन सिंदूरची ललकारी प्रत्येक कोपऱ्यात ऐकू येतेय. या ऑपरेशनमध्ये प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत उभा राहिला. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आभारी आहे. ते त्यांचे ऋणी आहेत. ऑपरेशन सिंदूर ही एक सामान्य लष्करी कारवाई नाही. ती भारताच्या धोरणाचा, हेतूंचा आणि निर्णायकतेचा संगम आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचे कौतुक केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world