रेल्वे 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे लागू करणार आहे. वाढलेले दर लांब पल्ल्याच्या आणि एसी ट्रेनसाठी असतील. लोकल म्हणजेच उपनगरीय ट्रेनच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. त्याचबरोबर मासिक पासवरही याचा कोणताही परिणाम होणार नाही. मासिक सीझन तिकीट (MST) जुन्या दरानेच मिळेल. त्यामुळे काही श्रेणींना दिलासाही मिळाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवीन दरानुसार, साधारण सेकंड क्लासमध्ये 500 किलोमीटरपर्यंत कोणताही बदल होणार नाही. परंतु 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढवला जाईल. त्याचबरोबर मेल/एक्स्प्रेस (नॉन-एसी) ट्रेनमध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होईल. एसी क्लासमध्येही प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, रेल्वेने ही भाडेवाढ कमीत कमी केली आहे. शिवाय त्यातून प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याचा रेल्वेचा उद्देशाने आहे, असं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, विविध ट्रेनमधील वेगवेगळ्या श्रेणींचे भाडे हे, त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांवर आधारित असते. विविध प्रकारच्या प्रवासी वर्गांसाठी वेगवेगळ्या ट्रेन सेवा उपलब्ध केल्या जातात. संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले होते की, भारतीय रेल्वे प्रवासाचा खर्च, प्रवाशांची वहन क्षमता, वाहतुकीच्या इतर प्रतिस्पर्धी साधनांशी स्पर्धा, सामाजिक-आर्थिक पैलू इत्यादी विचारात घेऊन भाडे निश्चित करत असते.
ते असं ही म्हणाले की "विविध ट्रेन/श्रेणींचे भाडे या ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांवर आधारित असते. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवासी विभागांसाठी विविध प्रकारच्या ट्रेन चालवते. वंदे भारत ट्रेनसह प्रवासी भाड्याचे मूल्यांकन आणि तर्कसंगतीकरण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याचा एक भाग म्हणून आता भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र ही भाडेवाढ नाममात्र असल्याचं ही सांगितलं जात आहे.