Railway: रेल्वेतील वेटिंग लिस्ट कधी संपणार? रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांना दिला दिलासा, सांगितला मोठा प्लॅन

Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी वेटिंग लिस्ट आणि कन्फर्म तिकीट न मिळणे ही एक कायमची डोकेदुखी बनलेली असते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Waiting List : या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालय सातत्याने काम करत आहे.
मुंबई:

Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी वेटिंग लिस्ट आणि कन्फर्म तिकीट न मिळणे ही एक कायमची डोकेदुखी बनलेली असते. सणासुदीच्या काळात किंवा सुट्ट्यांमध्ये तर हा त्रास आणखीनच वाढतो. या समस्येवरून अनेकदा रेल्वे प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील होत असते. याच पार्श्वभूमीवर आता थेट देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर मोठे वक्तव्य केले असून रेल्वे गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कधी संपणार, याचे स्पष्ट उत्तर दिले आहे. NDTV शी विशेष बातचीत करताना त्यांनी प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वेने आखलेला मेगाप्लॅन देखील सविस्तरपणे समजावून सांगितला आहे.

दरवर्षी 750 कोटी जणांचा प्रवास

रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट वाढण्यामागे मागणी आणि पुरवठा यातील प्रचंड तफावत हे मुख्य कारण असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. देशातील इतर वाहतूक साधनांच्या तुलनेत रेल्वेवर प्रवाशांचा भार सर्वाधिक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, दरवर्षी तब्बल 750 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. 

Advertisement

या तुलनेत देशातील रस्ते वाहतुकीने केवळ 250 कोटी आणि हवाई क्षेत्रातून म्हणजेच विमानाने फक्त 35 कोटी लोक वर्षभरात प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांची ही संख्या इतर साधनांपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्यामुळेच कन्फर्म तिकीट मिळण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.

( नक्की वाचा : Train Ticket: रेल्वे तिकिटांचा संपूर्ण पॅटर्न बदलणार! वेटिंग तिकिटांचा सस्पेन्स एका क्लिकवर संपणार, वाचा अपडेट )

वेटिंग लिस्ट संपवण्यासाठी रेल्वेचा मेगाप्लॅन

या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालय सातत्याने काम करत असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रवाशांचा हा प्रचंड दबाव कमी करण्यासाठी देशात आणखी नवीन 2 ते अडीच हजार रेल्वे गाड्या सुरू कराव्या लागतील. मात्र, नवीन गाड्या सुरू करण्यापूर्वी देशात नवीन रेल्वे रूळ टाकणे अत्यंत आवश्यक आहे. 

त्यासाठी रेल्वेने सुमारे 70000 किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशन केले असून, जवळपास 36000 किलोमीटरचे नवीन रेल्वे रूळ आतापर्यंत टाकण्यात आले आहेत. नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्यावर देशात आणखी नवीन गाड्या धावतील, ज्यामुळे येत्या काळात वेटिंग लिस्टची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

( नक्की वाचा : Mumbai Local: दादर, कुर्ल्याची गर्दी विसरा!आता लोकलने बोरिवली ते पनवेल थेट प्रवास!जाणून घ्या काय आहे प्लॅन )

गेल्या 12 वर्षांत रेल्वेमध्ये मोठे बदल

गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झाले असून भविष्यातही अनेक सुधारणा केल्या जाणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. पूर्वीच्या सरकारांच्या काळात रेल्वे क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, असा आरोपही त्यांनी केला. सध्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 90 टक्क्यांची मोठी घट झाली आहे.

Advertisement

यूपीए सरकारच्या काळात वर्षभरात जिथे सुमारे 180 रेल्वे अपघात होत होते, तिथे गेल्या वर्षात ही संख्या केवळ 16 वर रोखण्यात रेल्वेला यश आले आहे. गेल्या वर्ष रेल्वेच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित वर्ष ठरले असून, सुरक्षेचे हे प्रमाण अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.