Burning Bus: जैसलमेरजवळ नुकत्याच घडलेल्या भीषण बस अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः, एका संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याने या दुर्घटनेचे स्वरूप अधिकच हृदयद्रावक झाले आहे. महेंद्र मेघवाल (35), त्यांची पत्नी पार्वती आणि त्यांच्या दोन मुली- खुशबू आणि दीक्षा, तसेच त्यांचा लहान मुलगा शौर्य, अशी पाचही जण दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी आपल्या घरी परतत होते. पण ही त्यांची शेवटची यात्रा ठरली. या अपघातात या पाच ही जणांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर मेघवाल कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
दिवाळीची स्वप्ने जळून खाक
जैसलमेर येथील आर्मी डेपोमध्ये कार्यरत असलेले महेंद्र, पत्नीसोबत दिवाळीच्या तयारीच्या गप्पा मारत मोठ्या उत्साहाने जोधपूरजवळील आपल्या डेचू गावाकडे निघाले होते. मात्र, वाटेत बसला लागलेल्या भीषण आगीने (Fire) त्यांचे सारे स्वप्न, साऱ्या आशा जळून खाक झाल्या. या दुर्दैवी दुर्घटनेत एकूण 20 हून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. ज्यामुळे अनेक कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदाचे रूपांतर दुख:त झाले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब ऐस सणाच्या तोंडावर दुखाच्या सागरात लोटले गेले आहे.
'त्या' मातेच्या डोळ्यांत आता केवळ प्रतीक्षा
डेचू गावात महेंद्रची वृद्ध आई आपल्या नातवंडांची आणि मुलाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र, आता तिची ही प्रतीक्षा कधीच संपणार नाही. बसमधील आगीच्या रौद्र रूपामुळे मृतदेहांची ओळख पटवणेही (Identification) कठीण झाले आहे. त्यामुळे, मृतदेहांची ओळख निश्चित करण्यासाठी पोलीस आता डीएनए नमुने (DNA Samples) घेण्याची तयारी करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे महेंद्रच्या वृद्ध आईवर कोसळलेल्या दु:खाची कल्पना करणेही कठीण आहे. महेंद्रच्या पत्नीचे नातेवाईकही आता आपल्या मुलीची ओळख पटवण्यासाठी धडपडत आहेत. साऱ्यांच्याच डोळ्यांतून दु:खाचा महापूर वाहत आहे.
अखेरची भेट ठरली दुर्दैवी
जैसलमेरहून निघालेल्या महेंद्रच्या कुटुंबाला ही अखेरची भेट ठरणार याची कोणालाच कल्पना नव्हती. केवळ एक अपघात नव्हे, तर एका क्षणात एक संपूर्ण घर उद्ध्वस्त करणारी ही घटना आहे. पोलीस महेंद्रच्या आईला जोधपूरला आणण्याचा किंवा डीएनए चाचणीसाठी डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतरच त्यांच्या मृतदेहाची ओळख होणार आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील.