Abu Azmi on Aurangzeb : समाजवादी पक्षाचे नेता अबु आझमी औरंगजेबाबद्दल असं काही म्हणाले की, त्यावरुन राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय आज विधानसभा आणि विधानपरिषदेत अबु आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर नेत्यांनी संताप व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अबु आझमी?
औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची उभारणी केली आहे. औरंगजेबाच्या एका सेनापतीला पंडिताच्या मुलीशी लग्न करायचं होतं. तेव्हा त्यांनी त्या सेनापतीला दोन हत्तींच्या पायाला बांधून ठार मारलं. शेवटी त्या पंडितांने तिथे त्याच्यासाठी मशीद बांधली, बनारसमध्ये ही मशीद बांधण्यात आली आहे. सध्या चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाला मी एक क्रूर शासक मानत नाही.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder :'धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा!' दमानिया, धसांनी सांगितलेलं 'सातपुडा' कनेक्शन काय?
अबु आझमी यांच्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे अतोनात हाल करीत त्यांची हत्या केली, हे काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातूनही घराघरांमध्ये पोहोचलं. दरम्यान अबु आझमींनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली.
वाद वाढल्यानंतर आपल्या गोष्टींचं समर्थन करीत अबु आझमी म्हणाले, आपण जे वाचलं त्यावरून औरंगजेबाने आपल्या राजवटीसाठी एक रुपयाही घेतला नाही. औरंगजेबाच्या फौजेत हिंदू कमांडर होते. त्यावेळचा संघर्ष हिंदू-मुस्लिमांमधील नव्हता. त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत पसरली होती. देशात सोन्याचा धूर निघत होता. त्यानंतर इंग्रज भारतात आले.
अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून अबू आझमीचा निषेध!
औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यावरून शिवसेनेने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा निषेध केला. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून अबू आझमींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. अबू आझमी जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.