- उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याच्या मानसी गंगाने १२ वी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला
- मानसीच्या आईला शारीरिक अपंगत्व असून वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत
- गावातील लोकांनी मुलींना शिक्षणाऐवजी लग्नासाठी पैसे वाचवावे असे टोमणे दिले होते
Inspiring Story: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते, हे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील मानसी गंगा हिने सिद्ध करून दाखवले आहे. आई दिव्यांग आणि वडील अल्पभूधारक शेतकरी असतानाही, मानसीने कौटुंबिक गरिबीवर मात करत 12 वीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता जिद्दीच्या जोरावर यश कसे खेचून आणता येते, याचे उत्तम उदाहरण मानसी गंगा हिने घालून दिले आहे. शारीरिक अपंगत्व असलेल्या आईची साथ आणि शेतकरी वडिलांचे कष्ट वाया जाऊ न देता मानसीने हे यश मिळवले आहे. शिवाय आपल्या जिल्ह्याचे नाव ही मोठे केले आहे.
मानसीला दोन बहिणी असून त्यांना भाऊ नाही. "मुलींना शिकवून काय जिल्हाधिकारी बनवणार का?", "मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नासाठी पैसे वाचवा," असे टोमणे गावातील लोक तिच्या पालकांना मारायचे. मात्र, मानसीने याच टोमण्यांना आपली ताकद बनवले. निकाल जाहीर झाल्यानंतर जे लोक उपहास करायचे, तेच आज मानसीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन करत तिला मिठाई भरवत आहेत. त्यांना ही आपली चूक उमगली आहे. ते आता मानसीचे कौतूक करत आहेत.
23 एप्रिल 2026 रोजी जाहीर झालेल्या यूपी बोर्डाच्या निकालात मानसीने 500 पैकी 458 गुण मिळवले आहेत. तिची एकूण टक्केवारी 91.60% इतकी आहे. मैनपुरी जिल्ह्यातील गोसलपुर गावातील ती रहिवासी असून एससीएमडी इंटर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आपल्या यशाचे श्रेय मानसीने तिच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना दिले आहे. मानसी म्हणाली, "माझ्या पालकांनी गरिबी असूनही माझ्या शिक्षणात कधीच अडथळा येऊ दिला नाही. आता माझे स्वप्न एनडीए (NDA) मध्ये निवड होऊन लष्करात अधिकारी बनण्याचे आहे असं ती म्हणाले.
मुलींना शिकवून काय साध्य होणार, असा सवाल करणाऱ्या समाजाला मानसीने आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले आहे. मुलाचा अभाव आणि गरिबी यांमुळे मानसीच्या कुटुंबाला अनेकदा लोकांच्या कुत्सित बोलण्याचा सामना करावा लागला. मात्र, मानसीने या नकारात्मकतेचे रूपांतर ऊर्जेत केले. 500 पैकी 458 गुणांसह तिने मिळवलेले यश हे केवळ तिचे नसून, तिच्या पालकांच्या संघर्षाचा तो विजय आहे. भविष्यात भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे तिचे ध्येय असून, त्यादृष्टीने तिने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.