
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने झालेल्या अपघातामध्ये आत्तापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विमानातील 241 जणांचा समावेश होता. या अपघातानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N Chandrashekharan) यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपले विचार अत्यंत स्पष्टपणे मांडले आहेत.
एअर इंडियाच्या अहमदाबादमधील विमान अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाने यापूर्वीच एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. आता टाटा सन्सच्या अध्यक्षांनी आपल्या कर्मचाऱ्यांद्वारे देशाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे पत्र
प्रिय सहकाऱ्यांनो,
हा एक खूप कठीण क्षण आहे. काल जे काही घडले ते समजण्यापलीकडचे आहे आणि आम्ही सर्वजण धक्का आणि शोकात आहोत. एका व्यक्तीला गमावणे ही देखील एक शोकांतिका आहे, परंतु इतक्या लोकांचा एकाच वेळी मृत्यू होणे अविश्वसनीय आहे. हा टाटा समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे.
या क्षणी सांत्वनाचे शब्दही अपुरे पडत आहेत, परंतु या अपघातात ज्यांनी आपले आप्त गमावले किंवा जे जखमी झाले, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत माझ्या संवेदना आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा )
मी हे सांगू इच्छितो की, तुमच्याप्रमाणेच आम्हालाही विमान अपघात कसा झाला हे समजून घ्यायचे आहे. आम्हाला अजून माहिती नाही, परंतु आम्ही ती शोधून काढू. तुम्हाला माहीत आहे की गेल्या 24 तासांत भारत, यूके आणि अमेरिकेतून तपास पथके अहमदाबादला पोहोचली आहेत.

आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत आणि तपासचे निष्कर्ष पूर्णपणे पारदर्शकपणे जाहीर करू. हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही पीडित कुटुंबीय, वैमानिक, कर्मचाऱ्यांचे आणि तुमचे ऋणी आहोत. टाटा समूह समाजाप्रती आपली जबाबदारी गांभीर्याने घेतो आणि यात काल घडलेल्या घटनेबद्दल खुलेपणा राखणे देखील समाविष्ट आहे.
आत्ता आम्ही माणुसकीच्या नात्याने या दुर्घटनेतील पीडितांपर्यंत मदत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या अटकळी लावल्या जात आहेत. काही योग्य असू शकतात, काही चुकीच्या देखील असू शकतात.
मी तुम्हाला संयम बाळगण्याचे आवाहन करतो. आम्ही काल जीवघेणी हाणी पाहिली आहे. एक नियमित विमान उड्डाण अपघातग्रस्त कसे झाले हे समजून घेण्यासाठी प्रशिक्षित तपासकर्त्यांची मदत घेतली जाईल. एकदा त्यांचे तथ्य सत्यापित झाले की, आम्ही या दुर्दैवी घटनेच्या कारणांबद्दल पारदर्शकपणे माहिती देऊ. एक समूह म्हणून, ज्यावर अनेक लोक विश्वास ठेवतात, जेव्हा आम्ही एअर इंडियाची जबाबदारी घेतली, तेव्हा तिच्या प्रवाशांची सुरक्षा ही आमची पहिली आणि सर्वात मोठी प्राथमिकता होती. यात कोणतीही तडजोड केली गेली नाही.
तथापि, ज्यांनी काल भयानक नुकसान सहन केले आहे, त्यांच्यासाठी हे सर्व महत्त्वाचे नाही. या क्षणी, आम्ही त्यांना केवळ आमच्या पूर्ण पाठिंब्याची हमी देऊ शकतो. आम्ही एक समूह म्हणून एकत्र येऊ आणि पीडितांना मदत करण्याचे मार्ग शोधू. आम्ही या समूहाला विश्वास आणि काळजी यावर बांधले आहे. हा एक कठीण क्षण आहे, परंतु आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटणार नाही आणि जे योग्य असेल ते करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आम्ही हे नुकसान सहन करू. आम्ही ते विसरणार नाही.
तुमचा विश्वासू,
चंद्रा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world