आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दुचाकीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या कार्बन मोनोऑक्साइड (Carbon Monoxide) विषबाधेमुळे घरात झोपलेल्या दोन आठ वर्षांच्या जुळ्या बहिणी, त्यांचा 15 वर्षांचा भाऊ आणि 70 वर्षांच्या आजोबांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. एका चुकीच्या सल्ल्याने संपूर्ण हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
एका दुरुस्त केलेल्या दुचाकीचे इंजिन रात्रभर चालू ठेवण्याच्या अजब सल्ल्याने चित्तूर जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाचा घाला घातला आहे. बंद खोलीत साचलेल्या विषारी धुरामुळे दोन चिमुरड्या जुळ्या बहिणी, त्यांचा मोठा भाऊ आणि आजोबा अशा चौघांचा झोपेतच करुण अंत झाला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: नवस फेडायला गेले अन् भयंकर घडलं! सातबहिणी डोंगरावर थरार; 3 वर्षांच्या चिमुरडीसह चौघे जखमी)
नेमकं काय घडलं?
मुरली नावाचा व्यक्ती हेअर सलून चालवतो. त्याने नुकतीच आपली दुचाकी दुरुस्त करून आणली होती. मेकॅनिकने त्याला दुचाकीचे इंजिन रात्रभर चालू ठेवण्याचा सल्ला दिला होता. मुरलीने आपली दुचाकी घराच्या आत उभी केली आणि इंजिन चालू ठेवले. ज्या खोलीत त्याची दोन मुले आणि वडील झोपले होते, त्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या त्याने बंद केल्या. मुरली आणि त्याची पत्नी टेरेसवर झोपायला गेले. दरम्यान, दुचाकीच्या सायलेन्सरमधून निघणारा धूर बंद खोलीत साचत गेला आणि तेथे जीवघेणा कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार झाला.
ऑक्सिजनची पातळी कमी झाली
रात्रीच्या वेळी या विषारी धुरामुळे खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि झोपेतच चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये चंदना (8 वर्षे), चरिता (8 वर्षे), कार्तिक (15 वर्षे) आणि रामचंद्रय्या (७० वर्षे) यांचा समावेश आहे. घराचा दरवाजा उघडला त्यावेळी सकाळी जेव्हा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा हे चौघेही मृतावस्थेत आढळले.
(नक्की वाचा- Ahilyanagar News: पारनेर हादरलं! कीर्तनकार महाराजाचं नराधम कृत्य; अमानुष छळ करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार)
काय आहे कार्बन मोनोऑक्साइड?
कार्बन मोनोऑक्साइड हा एक रंगहीन आणि गंधहीन वायू आहे, ज्यामुळे त्याला 'सायलेंट किलर' म्हटले जाते. जेव्हा इंधन (पेट्रोल, गॅस, कोळसा) अपुऱ्या हवेत जळते, तेव्हा हा वायू तयार होतो. बंद खोलीत जनरेटर, रूम हिटर किंवा वाहनाचे इंजिन चालू ठेवल्यास हा वायू रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता नष्ट करतो, ज्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. चित्तूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.