- 2023 बॅचच्या दोन आयएएस अधिकाऱ्यांनी साध्या नोंदणीकृत विवाहाद्वारे लग्न केले
- माधव भारद्वाज आणि अदिती वास यांनी कोणत्याही गाजावाजाशिवाय केवळ नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केला
- माधव भारद्वाज यांनी लोकोमोटर दिव्यांगत्व असूनही यूपीएससीमध्ये ५३६ वी रँक मिळवली
आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे 2023 बॅचच्या दोन तरुण आयएएस (IAS) अधिकाऱ्यांनी साधेपणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये सेवेत असलेले एसडीएम माधव भारद्वाज आणि गुजरातच्या जामनगरमध्ये सेवेत असलेल्या एसडीएम अदिती वास बुधवारी विवाहबंधनात अडकले. कोणत्याही गाजावाजाशिवाय या जोडप्याने कोर्ट मॅरेज करून समाजाला मोठा संदेश दिला आहे. त्यांच्या या साधेपणाची सगळीकडेच चर्चा होत आहे.
मसुरीचे रहिवासी असलेले माधव आणि उत्तर प्रदेशच्या बरेली येथील अदिती यांची भेट प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणादरम्यान झाली होती. तिथेच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर त्यांनी थाटामाटात लग्न करण्याऐवजी नोंदणीकृत विवाहाला (Registered Marriage) पसंती दिली. त्यानुसार त्यांनी नोंदणी करत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाय साधे पणाने केलेल्या या लग्नाचे कौतूक ही होत आहे.
बुधवारी अलवरच्या जिल्हाधिकारी अर्पिता शुक्ला यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नाची नोंदणी केली. यावेळी कोणतेही ढोल-ताशे किंवा व्हीआयपी पाहुणे नव्हते. केवळ दोन्ही बाजूंचे आई-वडील आणि भावंडांच्या उपस्थितीत त्यांनी एकमेकांना हार घालून विवाह विधी पूर्ण केले. माधव भारद्वाज यांनी अनेक आव्हानांवर मात करून यूपीएससीमध्ये 536 वी रँक मिळवली होती. तर अदिती यांनी पहिल्याच प्रयत्नात 57 वी रँक पटकावली आहे.माधव भारद्वाज हे 2023 बॅचचे अधिकारी आहेत. आयआयएममधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यूपीएससीमध्ये 536 वी रँक मिळवली आहे. लोकोमोटर दिव्यांगत्व असूनही जिद्दीने त्यांनी यश मिळवले आहे.
तर अदिति वासने या उत्तर प्रदेशच्या आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 57 वी रँक मिळवून बरेली जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. दिल्लीच्या मिरांडा हाऊसच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. अलवरच्या मिनी सचिवालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. केवळ रक्ताच्या नात्यातील जवळची माणसे या सोहळ्याचे साक्षीदार होती. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी अत्यंत गोपनीय आणि साध्या पद्धतीने हा विधी उरकला. उच्चशिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world