‘आता परत येणार नाही...’, भरउन्हात भलीमोठी रांग, पिण्याचं पाणीही नाही, गुजरातमध्ये युपी-बिहारींचे प्रचंड हाल

Surat Udhna Station Huge Crowd Video: उधना रेल्वे स्थानकावर बिहार-यूपीला जाण्यासाठी प्रवाशांची अलोट गर्दी उसळली होती. 40 अंश सेल्सिअस उष्णता, गॅस टंचाई आणि अव्यवस्थेमुळे कामगारांचे प्रचंड हाल झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Udhna Station Crowd Video: सध्या सुरत आणि उधना रेल्वे स्थानकावर दिवाळी किंवा छट पूजेच्या सणासुदीच्या काळापेक्षाही भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. कडक उन्हाळा आणि वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकावर तुटून पडले आहेत. मात्र रविवारी उधना स्थानकावर झालेली गर्दी हाताळण्यात स्थानिक प्रशासन सपशेल फेल ठरल्याचे दिसून आले. 

भर उन्हात 2 किमी लांब रांगा

सुमारे 40 अंश सेल्सिअस तापमानात, हातामध्ये सामान घेऊन हे कामगार 14 ते 16 तास रेल्वे स्थानकावर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. स्टेशन परिसरातील पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची पुरेशी सोय नसल्याने लहान मुले आणि महिलांचे प्रचंड हाल झाले. उन्हाच्या तडाख्यामुळे आणि अन्नापाण्यावाचून काही प्रवासी बेशुद्ध पडल्याच्या घटनाही घडल्या.

Advertisement

गॅस टंचाईचा परिणाम

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात इंधनाच्या किमती आणि गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः 5 किलोचे एलपीजी सिलेंडर आता काळ्या बाजारात 350 ते 400 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. सुरतमध्ये राहणाऱ्या कामगारांना गॅस मिळणे कठीण झाल्याने आणि महागाईने कंबरडे मोडल्याने, अनेक कामगारांनी आता गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच स्टेशनवर अचानक प्रवाशांचा ओघ वाढला आहे.

बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न

गर्दी इतकी हाताबाहेर गेली की अनेक ठिकाणी प्रवाशांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. जरी रेल्वे प्रशासनाने "लाठीचार्ज झाला नाही, फक्त गर्दी नियंत्रित केली," असा दावा केला असला, तरी व्हिडिओमध्ये परिस्थितीची तीव्रता स्पष्टपणे दिसत आहे. एका प्रवाशाने कॅमेऱ्यासमोर आपली व्यथा मांडताना म्हटले की, "इतके हाल पाहून आता परत कधीच येणार नाही."

पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी 23000 पेक्षा जास्त प्रवाशांना विविध विशेष गाड्यांद्वारे रवाना करण्यात आले आहे. वाढती गर्दी पाहता रात्रीच्या वेळी अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, वास्तव रेल्वेच्या या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. केवळ दोन गाड्यांच्या आधारावर हजारो कामगारांना हाताळण्याचा प्रयत्न केल्याने हा गोंधळ उडाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

नागरिकांसाठी आवाहन

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अधिकृत रेल्वे तिकीट आणि वेळापत्रकानुसारच स्थानकावर पोहोचण्याचे सूचित केले आहे. 

Advertisement