PM Modi Speech Cancelled: लोकसभेत आज (बुधवार, 4 फेब्रुवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते, मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातल्याने मोठी खळबळ उडाली.
या गोंधळामुळे अखेर पंतप्रधानांचे भाषण रद्द करावे लागले आणि सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. या संपूर्ण राड्याची सुरुवात बुधवारी सकाळपासूनच झाली होती, ज्यामागे अनेक राजकीय कारणे दडली आहेत.
राहुल गांधींना रोखल्याचे कारण
सभागृहातील संघर्षाची सुरुवात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही भाग वाचण्यापासून रोखण्यात आल्यानंतर झाली. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत होत होते. मंगळवारीच विरोधी पक्षाच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले होते, त्यामुळे विरोधकांचा राग अनावर झाला होता आणि त्यांनी सरकारला घेण्याची पूर्ण तयारी केली होती.
( नक्की वाचा : Rahul Gandhi: राहुल गांधींनी कोणता नियम मोडला? चक्क एका पुस्तकामुळे जाऊ शकते खासदारकी; काय आहे प्रकरण? )
पंतप्रधानांच्या खुर्चीला महिला खासदारांचा वेढा
बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा सभागृह पुन्हा सुरू झाले, तेव्हा सर्वांचे लक्ष पंतप्रधानांच्या भाषणाकडे होते. मात्र, पंतप्रधान मोदी सभागृहात येण्यापूर्वीच वर्षा गायकवाड आणि जोतीमणी यांच्यासह विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी थेट पंतप्रधानांच्या आसनाकडे धाव घेतली.
या खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला चारही बाजूंनी वेढले आणि तिथेच ठिय्या मांडला. त्यांच्या हातात एक मोठा बॅनर होता, ज्यावर योग्य तेच करा असा संदेश लिहिलेला होता. खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता, ज्यामुळे सत्ताधारी बाकांवरील नेतेही अवाक झाले.
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीत राजकीय संघर्षाला धार; भाजपा कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना अटक )
भाजपाचा गंभीर आरोप आणि सुरक्षेचा प्रश्न
या घटनेनंतर सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी तात्काळ कामकाज तहकूब केले. काही मंत्र्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर या महिला खासदारांनी तिथून हटण्याचा निर्णय घेतला. या प्रकारावर भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांवर हल्ला करण्याच्या उद्देशानेच हे नियोजन केले होते, असा दावा त्यांनी केला. ही परिस्थिती अत्यंत भीतीदायक होती आणि संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, असेही तिवारी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
चीन सीमावाद आणि भाषण रद्द
दुपारी जेव्हा कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा विरोधकांनी 2020 मधील चीनसोबतच्या सीमावादाचा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. एका बाजूला खासदारांचे निलंबन आणि दुसऱ्या बाजूला सीमावाद या दुहेरी कोंडीमुळे सभागृहात कामकाज होणे अशक्य झाले. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण रद्द करण्यात आले आणि आभार प्रदर्शन प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. आता गुरुवारी पुन्हा या विषयावर चर्चा होण्याची शक्यता असून संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभेच्या पुढील कामकाजाकडे लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world