Eggs Expiry Date: उत्तर प्रदेश सरकारने अंडी उत्पादक आणि ग्राहकांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर 'एक्स्पायरी डेट' (कालबाह्यता तारीख) असणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई | Eggs To Come With Expiry Date
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जे व्यापारी किंवा शेतकरी या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी किंवा शेतकऱ्यांची अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा त्या अंड्यांवर 'खाण्यासाठी योग्य नाही' (Not fit for human consumption) असा शिक्का मारला जाईल. अनेक ठिकाणी जुनी आणि खराब झालेली अंडी विकली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
साठवणूक आणि तापमानाचे गणित | Egg Storage And Temperature
अंडी किती काळ खाण्यायोग्य राहतात, यावरही विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. जर अंडी 30 अंश डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवली गेली, तर अंडी घातल्यापासून दोन आठवड्यांपर्यंत सुरक्षित राहतात. पण जर ती 2 ते 8 अंश डिग्री सेल्सिअस तापमानात साठवली, तर ती पाच आठवड्यांपर्यंत चांगली राहू शकतात.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FSDA) च्या नियमांनुसार, अंडी आणि भाजीपाला एकाच कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येणार नाही. याचे कारण म्हणजे दोन्ही वस्तूंसाठी लागणारे तापमान आणि वातावरण वेगवेगळे असते. सध्या उत्तर प्रदेशात आग्रा आणि झाशी येथे अंड्यांसाठी स्वतंत्र कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहेत. TOIने दिलेल्या वृत्तानुसार अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन नियमांमुळे ग्राहकांना ताजी आणि सकस अंडी मिळणे सुलभ होईल तसेच उत्पादकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल.
Photo Credit: NDTV Marathi