Vijay Rally Stampede: चेन्नईहून साधारण 400 किलोमीटर दूर करूरमध्ये अभिनेता आणि राजकीय नेता विजय याच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आठ मुलांसह 39 लोकांचा मृत्यू झाला. रॅलीमधील चेंगराचेंगरीबाबत अनेक कारणं सांगितली जात आहे. मात्र यादरम्यान विजयच्या रॅलीदरम्यान काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या रॅलीसाठी दुपारपासून मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. टीवीके नेता आणि चित्रपट अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. विजय या रॅलीत तब्बल 7 तास उशिराने पोहोचला. हेदेखील चेंगराचेंगरीचं प्रमुख कारण असू शकतं.
विजयच्या रॅलीपूर्वी काय चूक घडली?
रोड शोची नव्हती परवानगी, तरीही...
विजयच्या पार्टीने या रॅलीसह अभिनेत्याच्या रोड शोची परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेचा विचार करता प्रशासनाने याची परवानगी दिली नव्हती. मात्र विजयने रॅली ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता निवडला तो रोड शोपेक्षा कमी नव्हता. पोलिसांनी सांगितलं की, रोड शोसाठी परवानगी नसतानाही विजयच्या कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचणं रोड शोमध्ये बदललं. इतक्या मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमात पोहोचले. पोलिसांनी याचा अंदाजही नव्हता. विजयची ही चूक चेंगराचेंगरीची कारण ठरू शकते.
10 हजार जणांची परवानगी, मात्र प्रत्यक्षात 27,000 पोहोचले
विजयच्या कार्यक्रमात प्रशासनाने दहा हजार लोकांची परवानगी दिली होती. पोलिसांनी त्यानुसार तयारी केली होती. मात्र प्रत्यक्षात रॅलीमध्ये २७ हजार लोक पोहोचले. ही देखील एक मोठी चूक होती. इतक्या मोठ्या संख्येने लोक कसे पोहोचले यावरही सवाल उपस्थित केला जात आहे. यातच विजय तब्बल सात तासांनी रॅलीत आले, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.
7 तास उशीर, जनरेटरच्या फ्लडलाइट्स बंद आणि...
तामिळनाडूचे प्रभारी डीजीपी जी वेंकटरमण यांनी सांगितलं की, अभिनेता-राजकीय नेता विजयला करूर रॅली पोहोचण्यासाठी सात तास उशीर झाला. यामुळे जमाव नियंत्रणाबाहेर गेला. तर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, रॅली सुरुवातील सामान्य होती, त्याचवेळी जनरेटरच्या फ्लडलाइट्स बंद झाल्या. एक महिला आपल्या मुलीला शोधत होती. यादरम्यान जमावातील काही लोक एका बाजूला ढकलले गेले आणि चेंगराचेंगरी झाली.