- आयटी क्षेत्रातील मानसिक ताणामुळे एका महिला मॅनेजरने नोकरी सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे
- तिने आयटी कंपनीत नऊ वर्षे काम केले असून सततच्या डेडलाईन्समुळे तणाव वाढला होता
- आता ती महिन्याला सुमारे साठ हजार रुपये कमावते आणि तिला मानसिक ताण किंवा बॉसची कटकट नाही
मोठ्या आयटी कंपन्यांमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि त्यासोबत येणारा मानसिक ताण हा सध्या चिंतेचा विषय बनत आहे. आयटी क्षेत्रात काम मिळालं की करिअर झालं असाच सर्वांचा मानस होता. पण आता अनेक तरुणांना हे क्षेत्र नकोसे वाटू लागले आहे. याच मानसिक ताणाला कंटाळून एका महिला आयटी इंजिनियरने चक्क नोकरी सोडली. विशेष म्हणजे तीने जवळपास नऊ वर्षे या कंपनीत मॅनेजर म्हणून काम केले. आता तिने नोकरी सोडून तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय त्यावर कमेंटचा ही पाऊस पडत आहे.
हा व्हिडिओ dr.nezrin_midhlaj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. संबंधित महिलेने आयटी क्षेत्रात तब्बल 9 वर्षे मॅनेजर म्हणून काम केले होते. मात्र, सततचे डेडलाईन्स आणि कामाच्या दडपणामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत होता. पैसे मिळत होते पण जिवाला शांती नव्हती. आराम नव्हता. होतं ते फक्त आणि फक्त टेन्शन. अखेर या तणावातून मुक्त होण्यासाठी तिने कॉर्पोरेट जगताला कायमचा रामराम ठोकला. आता ती रिक्षा चालवते. शिवाय महिन्याला जवळपास 60000 रुपये कमावत आहे. हे करत असताना तिला कोणताही मानसिक ताण नाही. किंवा बॉसची कटकट नाही असं ही ती सांगते.
"आता डोक्यावर कोणत्याही बॉसचे दडपण नाही आणि मी माझ्या अटींवर जगतेय," असे तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. शिवाय मी माझे नवे काम खूप एन्जॉय करते असं ही तिने म्हटले आहे. या व्हिडिओला 2 लाख 64 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते, या महिलेने आधी मोठी बचत केली असेल आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला असेल. तर काहींनी आयटी क्षेत्रातील आपल्या 18 वर्षांच्या अनुभवाचा दाखला दिला आहे. आजही तिथला ताण कमी झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
काहीने या तरुणीच्या धाडसाचे कौतूक केले आहे. असा निर्णय घ्यायला हिंमत लागते असं ही सांगण्यात आलं आहे. ही महिला केरळी असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. शिवाय ती बोलताना ही प्रसन्न वाटत आहे. पहीले नोकरी करताना ताण होता. आता तो ताण नाही. माझी मिच बॉस आहे. जे पैसे रिक्षा चालवून मिळतात त्यात आपण समाधानी असल्याचं ती या व्हिडीतून सांगत आहे. त्यामुळे आजची पिढी मानसिक आरोग्याला पैशांपेक्षा जास्त महत्त्व देत असल्याचेच यातून अधोरेखित होते.