- आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ अल्बिनो हॉग डीअरचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे
- मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा व्हिडिओ शेअर करत निसर्गाचा अनोखा चमत्कार असल्याचे म्हटले आहे
- अल्बिनिझममुळे या हरणाचा रंग पूर्णपणे पांढरा असून तो हिरव्यागार जंगलात चमकणाऱ्या ताऱ्यासारखा दिसतो
Albino Hog Deer Viral Video: निसर्गाच्या चमत्काराचा एक थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आसाममधील जागतिक प्रसिद्ध काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात एक दुर्मिळ पांढरे हरीण (अल्बिनो हॉग डीअर) कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वतः त्यांच्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय हा तर निसर्गाचा चमत्कार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ केवळ दुर्मिळ नसून आसामच्या समृद्ध वन्यजीवांचे दर्शन घडवणारा आहे असं ही त्यांनी सांगितलं आहे.
निसर्गाचा अनोखा चमत्कार
काझिरंगाच्या घनदाट जंगलात सामान्यतः तपकिरी रंगाची हरणे आढळतात. मात्र, 'अल्बिनिझम' या जनुकीय बदलामुळे या हरणाचा रंग पूर्णपणे दुधासारखा पांढरा झाला आहे. हिरव्यागार गवतामध्ये हे पांढरे शुभ्र हरीण एखाद्या चमकत्या ताऱ्यासारखे दिसत होते. या अनोख्या जीवाला पाहून तेथील पर्यटक आणि वन विभागाचे अधिकारीही थक्क झाले. ज्या पर्यटकांनी हे हरीण पाहीले त्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे कधी ही न विसरणारा होता. त्यांची ही ट्रीप सार्थ ठरली अशीच प्रतिक्रीया या पर्यटकांची होती. या हरणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वन्यजीव संरक्षणाचे यश
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना याला अत्यंत 'दुर्मिळ आणि उल्लेखनीय' क्षण म्हटले आहे. अशा दुर्मिळ जीवांचे दर्शन घडणे हे आपले जंगल आजही किती सुरक्षित आणि समृद्ध आहे, याचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वन्यजीव संरक्षणासाठी आसाम सरकार अत्यंत गांभीर्याने काम करत आहे. काझिरंगाच्या सौंदर्यात भर घालणारा हा पांढरा पाहुणा निसर्गाची एक अनमोल देणगी आहे असं ही ते म्हणाले. या शिवाय त्यांनी देशभरातील पर्यटकांना ही आसाममध्ये येण्याची साद घातली आहे.
आसाम पर्यटन
आसाममध्ये गेल्या काही वर्षात पर्यटन वाढत आहे. खास करून काझिरंगामध्ये बहुतांश पर्यटक येत असतात. निसर्गाचे अनोखा नजराणा म्हणून काझिरंगाकडे पाहीले जाते. त्यात आता या सफेद हरणामुळे या पर्यटनात आणखी वाढ होईल असं बोललं जात आहे. त्याला कारण या हरणाचा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे. आसाम पर्यटन विभाग आणि सरकार वन जीव संरक्षणासाठी जास्तीत जास्त गंभीर आहे. सरकारने ही बाब स्पष्ट केली आहे.