जाहिरात

Santhara : मृत्यूपर्यंत उपवास करण्याची जैन धर्मातील प्रथा तुम्हाला माहिती आहे का?

What is Santhara : जैन धर्मात संथारा ही ऐच्छिक मृत्यू घेण्याची प्रथा आहे. देशभरात या प्रथेवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Santhara  : मृत्यूपर्यंत उपवास करण्याची जैन धर्मातील प्रथा तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई:

What is Santhara :  मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका असह्य आजाराशी झुंज देणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू संथारानंतर झाला. एका अध्यात्मिक गुरुच्या सांगण्यावरुन संथाराचा पर्याय वापरण्यात आला. सर्वात कमी वयात संथारा करणारी मुलगी म्हणून तिचं नाव 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये दाखल करण्यात आलं, त्यावेळी ही प्रथा समोर आली. जैन धर्मात संथारा ही ऐच्छिक मृत्यू घेण्याची प्रथा आहे. देशभरात या प्रथेवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण तसंच जैन धर्मातील ही प्रथा नेमकी काय आहे? हे जाणून घेऊया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

आयटी प्रोफेशनल्स असलेले पीयूष आणि वर्षा जैन यांची मुलगी वियाना जैनला ब्रेन ट्यूमर झाल्याचं निदान गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झालं होतं. सर्व प्रकारचे उपचार तसंच ऑपरेशन अयशस्वी झाल्यानंतर या कुटुंबानं अध्यात्माचा आधार घेतला. त्यांनी 21 मार्च रोजी जैन भिक्षू राजेश मुनी महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुलीला आई-वडिलांच्या परवानगीनंतर संथारा व्रत दिले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच तिचा मृत्यू झाला. 

( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? ती घेण्याची वेळ का आली? वाचा सर्व प्रश्नांची उत्तर )
 

संथारा काय आहे?

कर्नाटकमधील पुरातत्व आणि संग्रहालय विभागचे प्रमुख ए. सुंदरा यांनी दिलेल्या महितीनुसार, संथाराला सल्लेखाना या नावानं देखील ओळखले जाते. ही एक जैन धर्मातील धार्मिक प्रथा आहे. त्यामध्ये व्यक्ती ऐच्छिक उपवासाच्या माध्यमातून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. या प्रथेमध्ये हळूहळू जेवण आणि पाणी घेणे बंद केले जाते. आत्म शुद्ध करण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत करण्यात येते. पण, हे व्रत स्वत:च्या इच्छेनं केले जात नाही. 

ए सुंदरा यांच्या संशोधनानुसार, जैन धर्मग्रंथामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. जी व्यक्ती मृत्यूच्या जवळ आहे. अथवा वृद्धापकाळानं त्रस्त, असह्य आजार किंवा दुष्काळासारख्या भीषण परिस्थितीमध्ये धार्मिक कर्तव्य करण्यास असमर्थ असेल, अशीच व्यक्ती संथारा हे व्रत करु शकते. 

संथाराचे पालन कसे होते?

समंतभ्रद यांचा रत्नकरंद श्रावकाचार हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. तो चौथ्या शतकाच्या आसपास लिहिण्यात आलाय. यामध्ये संथारा व्रतचे पालन कसे करावे याची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. 

या पुस्तकात सांगण्यात आले आहे की, हे व्रत शरीराला मुक्त करण्यासाठी केलं पाहिजे. पण, अतिशय टोकाच्या परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ नैसर्गित संकट, वृद्धत्व किंवा आजारावरील कोणतेही निदान होत नसेल तरच हे व्रत करावे. 

व्रत करणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यांनी संपूर्ण संपत्तीचा त्याग करावा. प्रिय व्यक्तीपासून मानसिकदृष्ट्या वेगळे व्हावे. त्यांना माफ करावं किंवा त्यांची माफी मागावी. स्वत:च्य़ा चुकीच्या कामासाठी खेद व्यक्त करावा. त्यानंतर शांत मनानं प्रार्थना आणि ध्यानावर लक्ष केंद्रीत करावे. हळूहळू खाणे-पिणे बंद करावे. मृत्यूपर्यंत उपवास करावा. 

( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणेला भाजपा आणि RSS नं होकार का दिला? वाचा Inside Story )
 

संथारा कायदेशीर आहे का?

जैन धर्मात संथारा ही एक स्वीकृत आणि पूजनीय प्रथा आहे. त्यानंतर या प्रथेला कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. राजस्थान उच्च न्यायालयानं 2015 साली संथारा अवैध असल्याचे जाहीर केले होते. भारतीय दंड संहिता (आयपीएसी) मधील कलम 306 नुसार आत्महत्येच्या बरोबरचा दर्जा याला देण्यात यावा, असं त्यांनी स्पष्ट केलं. एखाद्याने स्वत:चे आयुष्य समाप्त करण्याचा निर्णय हा स्वत:ला हानी पोहोचवण्याचा प्रकार आहे. त्याला धार्मिक प्रथा म्हणून न्याय ठरवता येत नाही, असं कोर्टानं स्पष्ट केले होते.  

जैन समाजानं या निर्णयाचा विरोध केला. त्यानंतर एक महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय स्थगित केला. धार्मिक स्वातंत्र्य संरक्षणाच्या अंतर्गत संथारा सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com