Amavasya March 2026 Date And Time: हिंदू पंचांगानुसार यंदा फाल्गुन महिन्याची अमावस्या दोन दिवस असल्याने लोकांमध्ये तिथीबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण, पूजेची योग्य वेळ कोणती आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात कधी होणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
कधी आहे फाल्गुन अमावस्या? जाणून घ्या योग्य तिथी, तारीख आणि वेळ | Falgun Amavasya 2026
यंदा फाल्गुन महिन्यातील अमावस्या तिथीची सुरुवात 18 मार्च रोजी सकाळी 8.25 वाजता सुरू होऊन 19 मार्च रोजी सकाळी 6.52 वाजता समाप्त होईल. यामुळे अमावस्येचा प्रभाव दोन्ही दिवशी जाणवेल. पण धार्मिक दृष्टिकोनातून पितृ तर्पण आणि दानधर्मासाठी 18 मार्चचा दिवस अधिक शुभ मानला गेला आहे, कारण या दिवशी दुपारच्या वेळी अमावस्या तिथी असेल. 19 मार्चच्या सकाळी अमावस्या संपल्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू होईल आणि चैत्र नवरात्रीचा शुभारंभ होईल. चैत्र नवरात्रौत्सव 27 मार्चपर्यंत असेल. गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षासही प्रारंभ होणार आहे.
अमावस्येला पितृ तर्पण का केले जाते?
धार्मिक मान्यतेनुसार, अमावस्येचा दिवस पितरांना समर्पित असतो. या दिवशी लोक आपल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पण, पिंडदान आणि दानधर्म करतात. अमावस्येच्या दिवशी पूर्वज पितृलोकातून आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यामुळे या दिवशी केलेले तर्पण त्यांना तृप्त करते आणि ते आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. तसेच या दिवशी केलेल्या दान आणि पूजेमुळे पितृ दोष शांत होतो, अशीही मान्यता आहे.
अमावस्येच्या दिवशी नेमके काय करावे?- सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.
- दुपारच्या वेळी पितरांसाठी तर्पण करावे, हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.
- गुळ-तूप,खीर-पुरी इत्यादींचा नैवेद्य पितरांना अर्पण करावा.
- भगवान शंकराची पूजा करावी; शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे.
- पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रदक्षिणा घालावी.
- गाय, कावळा, कुत्रा आणि गरजू व्यक्तींना भोजन द्यावे.
- संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना करावी.
- हनुमानजींची पूजा करून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे.
(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: डॉ अपर्णा बांदोडकरला अशी मिळाली बुलेट राणी म्हणून ओळख, यंदाच्या सरप्राइज लुककडे सर्वांचं लक्ष)
19 मार्च रोजी काय करावे?
19 मार्चच्या सकाळी अमावस्या समाप्त होईल, त्यामुळे या दिवशी पहाटे नदीस्नान करणे शुभ मानले जाते. त्यानंतर चैत्र नवरात्रीला प्रारंभ होईल. तसेच गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाला आरंभ देखील होणार आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)