Corporate India Shocked: भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो महिला कर्मचाऱ्यांबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे. गर्भपाताच्या गंभीर समस्येमुळे भारतातील तब्बल 7 कोटी नोकरदार महिला सध्या आपली नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत, तर 7 कोटी 8 लाख महिलांना या संवेदनशील कारणामुळे आपली नोकरी गमवावी लागण्याची भीती सतावत आहे.
क्वेस्ट ग्लोबल या अभियांत्रिकी सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी YouGov च्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या 'कॉस्ट ऑफ सायलेन्स' या विशेष अहवालातून महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी आणि करिअरशी जोडलेली ही भयंकर परिस्थिती पहिल्यांदाच समोर आली आहे.
नोकरदार महिलांना कशाची मोठी भीती?
कामाच्या ठिकाणी महिलांना त्यांच्या वैयक्तिक आरोग्याशी संबंधित, विशेषतः गर्भपातासारख्या अत्यंत वेदनादायी प्रसंगाविषयी उघडपणे बोलणे किती कठीण जाते, यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले की, बहुतांश महिला हा मानसिक आणि शारीरिक त्रास मूकपणे सहन करत राहतात.
गर्भपात झाल्याचे ऑफिसमध्ये सांगितल्यास नोकरी जाण्याची भीती 7.8 कोटी महिलांना वाटते, तर ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेच्या किंवा टीकेच्या भीतीमुळे जवळपास 8 कोटी महिला या विषयावर पूर्णपणे गप्प राहणे पसंत करतात.
( नक्की वाचा : 'तिने आरडाओरड केली अन्..." डहाणूमध्ये तरुणीच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; लव्ह जिहादनंतर आणखी एक प्रकार )
25 ते 39 वयोगटातील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण
हा अहवाल तयार करण्यासाठी भारतातील 25 ते 39 वयोगटातील 2000 हून अधिक महिला आणि 200 पुरुष कर्मचाऱ्यांचे सखोल सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये स्टेम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील कनिष्ठ, मध्यम तसेच वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
दर 4 पैकी 3 महिलांनी स्पष्ट केले की, गर्भपाताच्या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळतो आणि कामाच्या ठिकाणी यावर बोलता येत नसल्यामुळे त्यांच्या उत्पादकतेवर आणि कामावर याचा अतिशय विपरीत परिणाम होतो.
'ब्रेक द सायलेन्स' राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात
या समस्येचे गांभीर्य ओळखून क्वेस्ट ग्लोबलने 'ब्रेक द सायलेन्स' ही अशा प्रकारची पहिलीच राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. गर्भपात हे केवळ महिलांच्या आरोग्याशी संबंधित नसून कामाच्या ठिकाणी असलेल्या उत्पादकतेचे संकट आहे, हे कॉर्पोरेट नेत्यांनी ओळखले पाहिजे, असे आवाहन कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ अजित प्रभू यांनी केले आहे.
महिला कर्मचाऱ्यांना या कठीण काळात आधार देण्यासाठी क्वेस्ट ग्लोबलने YourDOST सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत 24 तास सुरू असणारी विनामूल्य हेल्पलाइन, तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापकांसाठी विशेष प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.
सकारात्मक बदलासाठी बड्या कंपन्या एकत्र
जेव्हा कंपन्या महिलांना अशा संवेदनशील काळात मोकळेपणाने बोलण्यासाठी आणि हक्काची रजा घेण्यासाठी सुरक्षित वातावरण देतात, तेव्हा 48% महिला आपले म्हणणे मोकळेपणाने मांडू शकतात, असेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
या चळवळीचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील कार्यस्थळांचे वातावरण बदलण्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्रातील इतर बड्या कंपन्या देखील पुढे आल्या आहेत. यामध्ये भारत सीरम अँड व्हॅक्सिन्स, कोने, अमरा राजा, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स या पाच मोठ्या संस्थांनी आधीच या मोहिमेत सहभागी होऊन महिला कर्मचाऱ्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.