- गुलाब जामुन या मिठाईचे नाव फारसी भाषेतील गुलाब आणि जामुन या शब्दांपासून आले आहे ज्याचा अर्थ वेगळा आहे
- फारसीमध्ये 'गुल' म्हणजे फुल आणि 'आब' म्हणजे पाणी
- जामुन या नावाचा संबंध मिठाईच्या आकाराशी असून त्याचा रंग आणि आकार जांभळ्या फळासारखा असल्याने ठेवला गेला
Gulab Jamun History: भारतात जेव्हा मिठाईच्या विषयावर चर्चा होते, तेव्हा गुलाबजामुनचा उल्लेख होणार नाही, असे होणे शक्यच नाही. लग्नकार्य असो किंवा सण-उत्सव, प्रत्येक आनंदाच्या क्षणी या मिठाईला लोकांची पसंती असते. मऊ, रसाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारा गुलाबजाम खायला प्रत्येकालाच आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या मिठाईमध्ये ना गुलाब असतो ना जाम, मग या मिठाईचे नाव 'गुलाब जामुन' का पडले? हा प्रश्न जितका मजेशीर वाटतो, तितकीच यामागील कहाणी रंजक आहे. या नावामागे इतिहास, भाषा आणि चव यांचा अनोखा संगम दडला आहे.
गुलाब जामुन: फारसी भाषेशी जोडले आहे नाव
गुलाब जामुन हे नाव 'गुलाब' आणि 'जामुन' या दोन शब्दांनी मिळून बनले आहे. पण येथे गुलाब म्हणजे फुल नसून, हे नाव फारसी भाषेतील दोन शब्दांपासून आले आहे. फारसीमध्ये 'गुल' म्हणजे फुल आणि 'आब' म्हणजे पाणी. जुन्या काळात ही मिठाई गुलाबपाणी घातलेल्या साखरेच्या पाकात भिजवून तयार केली जात असे, म्हणून याचे नाव 'गुलाब' पडले. दुसरीकडे 'जामुन' हे नाव त्याच्या आकारामुळे पडले. पूर्वीच्या काळी गुलाब जामुन हे आकाराने थोडे लांबट आणि गडद रंगाचे असायचे, जे हुबेहूब जांभळाच्या फळासारखे दिसायचे. यामुळेच त्याला जामुन म्हटले जाऊ लागले.
(नक्की वाचा : Fake Bananas: नैसर्गिक की केमिकलयुक्त धोकादायक केळ? खरेदीपूर्वी 6 ट्रिक्सद्वारे ओळखा फरक, 10 सेकंदाचा फॉर्म्युला येईल कामी)
Photo Credit: Pexels
फारसी आणि तुर्की कनेक्शन
ही मिठाई फारसी आणि तुर्की मिठायांपासून प्रेरित असल्याचे मानले जाते. काही लोक म्हणतात की, मुघल सम्राट शाहजहानच्या आचाऱ्यांनी चुकून एक नवीन मिठाई तयार केली, जी पुढे गुलाब जामुन म्हणून प्रसिद्ध झाली. त्या काळात खवा आणि दुधापासून तयार केलेल्या मिठाई प्रचंड लोकप्रिय होत्या. आचाऱ्यांनी खव्याचे छोटे गोळे करून ते तुपात तळले आणि सुगंधी पाकात टाकले. ही मिठाई इतकी आवडली की हळूहळू हा गोड पदार्थ संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला.
आजकाल बाजारात विविध प्रकारचे गुलाब जामुन विक्रीसाठी उपलब्ध असतात, पण पूर्वी ते फक्त खवा, मैदा आणि वेलचीपासून तयाच केले जायचे. त्यानंतर ते मंद आचेवर साजूक तुपात तळले जात, जेणेकरून ते आतून मऊ राहतील. पाकात केशर आणि गुलाबपाणी घातले जात असे, ज्यामुळे त्याचा सुगंध आणि चव अधिकच खास बनायची.
(नक्की वाचा : Milk Packet Color Code: दुधाच्या पिशवीवर निळा, हिरवा आणि नारिंगी रंग का असतो? 99% लोकांना माहिती नसणार कलर कोडचं गुपित)
भारताच्या कानाकोपऱ्यात बदलली चव
काळाप्रमाणे प्रत्येक राज्यात गुलाब जामुन तयार करण्याची पद्धत बदलली. ड्रायफ्रूट्सचे गुलाबजाम, ब्रेड किंवा मिल्क पावडरपासून तयार केलेले गुलाब असे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजाम खवय्यांसाठी उपलब्ध होऊ लागले. चॉकलेट, आइस्क्रीम आणि अगदी पान फ्लेव्हरचे गुलाब जामुनही बाजारात मिळतात.
जागतिक स्तरावर ओळख
गुलाब जामुन केवळ भारतातच नाही, तर परदेशातही अतिशय लोकप्रिय आहे. भारतीय रेस्टॉरंट्समध्ये सर्वाधिक ऑर्डर केल्या जाणाऱ्या मिठायांमध्ये या पदार्थाचा समावेश होतो. अनेक परदेशी नागरिक याला 'इंडियन डोनट' असेही म्हणतात. गुलाब जामुन ही केवळ एक मिठाई नसून भारतीय परंपरा आणि चवीचा एक अविभाज्य भाग बनली आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)