केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि त्यांना योग्य पोषण मिळण्यासाठी तेल लावणे हा भारतीय दिनचर्येतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र, धावपळीच्या जीवनशैलीत डोक्याला तेल कधी लावावे, रात्रभर तेल लावून झोपणे योग्य की अयोग्य आणि आठवड्यातून किती वेळा तेल लावावे, याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित आयुर्वेदाचार्य आणि योगगुरू प्रा. डॉ. राम अवतार यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
डॉ. राम अवतार यांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना तेल लावणे पुरेसे आहे. ज्यांचे केस खूप कोरडे आहेत, त्यांनी आठवड्यातून 3 वेळा तेल लावावे. ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळाच तेल लावावे. जास्त प्रमाणात तेल लावल्याने डोक्याच्या त्वचेवर धूळ आणि घाण साचू शकते, ज्यामुळे केसांचे नुकसान होते असं ही डॉ. राम अवतार यांनी स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा - Ayurveda: आंघोळी करण्याआधी नाभीमध्ये पाणी टाकले तर काय होतं? 99% लोकांना माहितच नाही
केसांना रात्रभर तेल लावून ठेवणे चुकीचे ठरू शकते. यामुळे स्कॅल्पशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस धुण्याच्या 1 ते 2 तास आधी तेल लावणे सर्वात उत्तम मानले जाते. तेल हलके कोमट करून बोटांच्या साहाय्याने मसाज करावा. 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यानंतर लगेच विंचरू नये. 1 ते 2 तासांनंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवावेत.
तुमच्या केसांच्या गरजेनुसार खोबरेल तेल, तिळाचे तेल, आवळा किंवा भृंगराज तेलाची निवड करावी. केवळ तेल लावल्याने केस गळती पूर्णपणे थांबत नाही, तर त्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी ठेवणे तितकेच गरजेचे आहे. भृंगराज आणि आवळा तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी उपयुक्त होते. केसांना तेल लावण्यासोबतच चांगला आहार, प्रोटीन, आयर्न आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.