- नैसर्गिक आंब्याचा हंगाम मे आणि जून महिन्यांत असतो, पण बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये आंबे मिळत आहेत
- रसायनांनी पिकवलेले आंबे गंधहीन किंवा रासायनिक दर्पयुक्त असतात, तर नैसर्गिक आंब्याला गोड आणि मातीचा सुगंध असतो
- झाडावर पिकलेल्या नैसर्गिक आंब्याच्या रंगात हिरवट व तपकिरी डाग दिसतात, तर कृत्रिम आंबा एकसारखा पिवळा असतो
How To Identify Real Mangoes: उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा असलेल्या आंब्याची ओढ सर्वांनाच लागते. मात्र, खऱ्या अर्थाने उन्हाळा तापण्यापूर्वीच बाजारपेठेत पिवळेधमक आणि आकर्षक आंबे दाखल झाले आहेत. हे आंबे पाहून तुमचाही मोह आवरत नसेल, तर थोडं थांबा! कारण हे मोहक आंबे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. डॉ. समीर भाटी यांच्या मते, आंब्याचा नैसर्गिक हंगाम मे आणि जून महिन्याचा असतो. तरीही फेब्रुवारी-मार्चमध्येच बाजारात आंबे उपलब्ध होत आहेत. हे आंबे 'कॅल्शियम कार्बाइड'सारख्या धोकादायक रसायनांनी पिकवले असण्याची शक्यता अधिक आहे.
नैसर्गिक आणि कृत्रिम आंब्यातील फरक कसा ओळखावा?
- गंध: नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याला एक विशिष्ट गोड आणि मातीचा सुगंध असतो. याउलट, रासायनिक आंब्याला एकतर वास नसतो किंवा त्यातून रसायनांचा उग्र दर्प येतो.
- रंग: झाडावर पिकलेला आंबा कधीही पूर्णपणे एकसारखा पिवळा नसतो. त्यावर कुठे हिरवट तर कुठे तपकिरी डाग असतात. जर आंबा सर्व बाजूंनी एकसारखा चमकदार पिवळा दिसत असेल, तर समजावे की तो कृत्रिमरीत्या पिकवला आहे.
- पोत आणि स्पर्श: रसायनांनी पिकवलेले आंबे जास्तच मऊ किंवा दबलेले असतात. मात्र, नैसर्गिक आंब्यामध्ये एक प्रकारचा घट्टपणा (Firmness) जाणवतो.
रसायनयुक्त आंब्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम
डॉक्टरांच्या मते, कॅल्शियम कार्बाइड हे एक विषारी द्रव्य आहे. याचा थेट परिणाम यकृतावर (Liver) होतो. तसेच गॅस, ॲसिडिटी, डोकेदुखी आणि चक्कर येणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना फूड पॉयझनिंग होण्याचा धोका जास्त असतो. बाजारात मिळणारे आंबे तुमच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत. उन्हाळा पूर्णपणे सुरू होण्याआधीच रसाळ दिसणारे आंबे विक्रीसाठी आले आहेत. पण हे आंबे नैसर्गिकरीत्या पिकले नसून केमिकल्सचा वापर करून पिकवले जात असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. चवीच्या नादात आपण अनेकदा गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतो आणि हेच आपल्या जीवावर बेतू शकते.
नैसर्गिक आंबा खाल्ल्यावर गोडवा जाणवतो, पण केमिकलचा आंबा खाल्ल्यावर जिभेवर किंवा घशात थोडी जळजळ जाणवू शकते. जो आंबा दिसायला अतिशय सुंदर आणि डागविरहित असतो, तो बहुधा रसायनांच्या मदतीने पिकवलेला असतो. नैसर्गिक आंब्यावर थोडे डाग असणे स्वाभाविक आहे. डॉ. समीर भाटी म्हणतात की, रसायने वापरून पिकवलेले फळ आतून विषासमान असते. यामुळे पोटाचे विकार वाढतात आणि दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास मज्जासंस्थेशी संबंधित (Neurological) समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आंबा खरेदी करताना घाई न करता, त्याची पारख करूनच तो घरी न्यावा.