Liquor News : एक काळ असा होता जेव्हा मोठ्या मद्य उत्पादक कंपन्या अमेरिका, युरोप आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांवर अवलंबून असत. मात्र आता हे चित्र बदलत चाललं आहे. जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये दारूचा खप कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भारतीय बाजारपेठ मात्र मद्य उद्योगासाठी तेजीत होणार असल्याचं चित्र आहे.
मद्य उद्योगासमोर सध्या अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. महागाई वाढत आहे. त्यामुळे खर्च करण्यासाठी लोकांकडे पैसे कमी शिल्लक राहतात. याशिवाय आरोग्याविषयीची जागरूकताही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे लोकांचं दारू पिण्याचं प्रमाण कमी केलं आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि चीनसारख्या देशांमधील तरुण पिढी पूर्वीच्या तुलनेत कमी दारू पित आहे. याच कारणास्तव आगामी काळात या बाजारपेठांमध्ये मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
भारतात मद्याची मागणी का वाढतेय?
भारतात मात्र याच्या अगदी उलट आहे. भारतातील तरुण लोकसंख्या, वाढतं उत्पन्न आणि शहरीकरण यामुळे येथील मद्य बाजारपेठेला मोठी मजबुती मिळत आहे. लोकांचं उत्पन्न वाढत असताना स्वस्त उत्पादनांऐवजी प्रीमियम आणि ब्रँडेड दारू खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जात आहेत. IWSR च्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण बेव्हरेज अल्कोहोलची विक्री गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे आणि येत्या काळात ती आणखी वाढू शकते. त्यामुळे जगभरात जरी मद्याची विक्री कमी होत असली तरीही भारतात मात्र मद्यविक्री वाढत असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे भारतावर मद्य कंपन्यांची नजर
जागतिक स्तरावर मागणी कमी होत असताना, मोठ्या आंतरराष्ट्रीय मद्य कंपन्या भारताकडे स्वतःची सर्वात महत्त्वाची ग्रोथ मार्केट पाहत आहेत. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपली गुंतवणूक वाढवत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०३२ पर्यंत भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मद्य बाजार बनू शकतो. जागतिक मद्य उद्योगासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.